राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा तडाखा; निवडणूक यंत्रणेचा दिलासा...!

काॅंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयात माफी मागावी लागली. चौकीदार चोर है, असे राफेलप्रकरणी बोलल्याने न्यायालयाने त्यांना नोटीस दिली होती. दुसरीकडे त्यांचा अमेठीतील निवडणूक अर्ज वैध ठरला आहे.
राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा तडाखा; निवडणूक यंत्रणेचा दिलासा...!

अमेठी : अमेठी लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे उमेदवार कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा अर्ज वैध ठरल्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आज स्पष्ट केले. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर आक्षेप घेत त्यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली होती. 

जिल्हा निवडणूक अधिकारी राम मनोहर मिश्रा यांनी राहुल गांधी यांचा अर्ज वैध असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावरून प्रश्‍न उपस्थित केले गेले आणि त्यांचा अर्ज रद्दबातल करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मिश्रा यांनी राहुल गांधी यांचे वकील के. सी. कौशिक यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर उमेदवारी अर्ज वैध असल्याचा निर्वाळा दिला. अमेठीचे अपक्ष उमेदवार ध्रुवलाल यांचे वकील रवी प्रकाश यांनी निवडणूक अधिकाऱ्यांसमक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर शंका उपस्थित केली होती. राहुल गांधी हे ब्रिटिश नागरिक असून, त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी तक्रार करण्यात आली होती. 

राहुल गांधींकडून दिलगिरी 

राफेलप्रकरणी चौकीदार चोर है असे विधान केल्याबद्दल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर करून न्यायालयाची माफी मागितली. निवडणुकीतील प्रचारादरम्यान आवेशात आणि भावनेच्या भरात विधान केले आणि त्याचा विरोधकांकडून विपर्यास करण्यात आला, असा दावा राहुल गांधी यांनी केला. 

राफेल करारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली होती. राहुल यांनी, "सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चोर म्हटले आहे,'' अशी प्रतिक्रिया दिली होती. ही प्रतिक्रिया त्यांनी अमेठी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली होती.

या वक्तव्यावर आक्षेप घेत ज्येष्ठ वकील आणि भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सर्वोच्च न्यायालयात राहुल गांधी यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल केली. राहुल गांधी यांनी आपले व्यक्तिगत मत सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घातल्याचे याचिकेत म्हटले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांनी 22 एप्रिलपर्यंत खुलासा करावा असे सांगितले होते. तसेच, अशा प्रकारचे कोणतेही मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले नसल्याचे स्पष्टीकरण न्यायालयाने दिले होते. त्यानंतर राहुल यांनी आज शपथपत्र दाखल करत दिलगिरी व्यक्त केली. निवडणुकीच्या प्रचारात भावनेच्या भरात आपल्या तोंडून वाक्‍य निघाले, असे त्यांनी म्हटले आहे. यावर 23 एप्रिलला सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार आहे. 

``चौकीदाराला चोर म्हणणारे राहुल गांधी यांनी आपण खोटारडे आहोत, हे मान्य केले. नागरिकांना मूर्ख समजणाऱ्यांना, पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाचा अपमान करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही,`` अशी प्रतिक्रिया स्मृती इराणी यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com