अशोकरावांची दमदार कामगिरी राहुल गांधींसाठी अद्याप बेदखल 

कॉंग्रेस नेत्यांसाठी अशोक चव्हाणांची नांदेड महापालिकेतील दमदारकामगिरी अद्यापबेदखल आहे. ना राहुल गांधी यांनीअशोक चव्हाणांचे फोनवरून अभिनंदन केले ना त्यांनी ट्‌विटरवरून त्याचे सेलिब्रेशन केले. कॉंग्रेस प्रवक्ते टिव्हीवर जोरदार बोलले. पण पक्षाचे इतर राज्यस्तरीय नेत्यांनी या यशाबद्दल फार उत्सुकता दाखविली नाही. हे नेते प्रदेश कार्यकारिणी समितीवर आपली किंवा आपल्या समर्थकांचीवर्णी कशी लागेल, याच प्रयत्नात सध्या आहेत.
अशोकरावांची दमदार कामगिरी राहुल गांधींसाठी अद्याप बेदखल 

पुणे : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर भाजपने राज्यात आपण एक नंबर कामगिरी केल्याचा दावा केला. या दाव्यात तसा कोणता आधार नव्हता. तरीही मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सर्वांनी या यशाचे गोडवे गायले. मात्र कॉंग्रेसमध्ये उलटे घडत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये भाजपला धूळ चारली तरी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी किंवा उपाध्यक्ष राहुल गांधी या यशाबद्दल ट्विटरवरून काही टिप्पणी करावीशी वाटली नाही. 

नांदेडचा निकाल हाती येऊन चोवीस तास उलटले आहेत. तरी तोपर्यंत काॅंग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांनी काही संदेश दिलेला नाही. नांदेडची निवडणूक राज्यातील टर्निंग पाॅंइंट असल्याचे राजकीय विश्लेषक बोलत असले तरी काॅंग्रेस नेत्यांना त्याची माहिती पोचली की नाही, याचीच शंका आहे.

राज्यात गेल्या आठवड्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या कथित दमदार यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्‌विटरवरून तीन संदेश दिले होते. "महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक आभार', असे खास मराठीतही नमूद केले होते. ही कामगिरी म्हणजे जनतेने भाजपच्या कामावर दाखविलेला विश्‍वास आहे, असाही अभिमान दाखविण्यात आला होता. या यशाला तसा आधार काही नव्हता. कारण की या ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर झालेल्याच नव्हत्या. तरीही भाजपने सोशल मिडियातून असा काही प्रचार केला की राज्यात भाजपच यात नंबर एकवर असल्याचा देखावा तयार झाला. 

याउलट नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत अशोक चव्हाण हे बाजीगर ठरले. 81 पैकी 73 जागा जिंकत त्यांनी नांदेडमधील ऐतिहासिक कामगिरी केली. 95 टक्‍क्‍यांहून अधिक जागा एकाच पक्षाला मिळण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. कॉंग्रेससाठी आत्मविश्‍वास वाढविणारा हा विजय ठरला. गेल्या तीन वर्षांच्या सर्वच निवडणुकांत एक-दोन अपवाद कॉंग्रेसला सर्वत्र धूळ चाखावी लागली होती. या तीन वर्षांत पहिल्यांदाच भाजपला रोखण्यात कॉंग्रेसला यश आले. हे यश म्हणजे भाजपच्या उधळलेल्या घोड्याला लगाम घालणारे असल्याची भावना व्यक्त झाली. भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला, असाही दावा करण्यात आला. 

कॉंग्रेस नेत्यांसाठी मात्र ही कामगिरी अजून बेदखल आहे. ना त्यांनी अशोक चव्हाणांचे फोनवरून अभिनंदन केले ना त्यांनी ट्‌विटरवरून त्याचे सेलिब्रेशन केले. कॉंग्रेस प्रवक्ते टिव्हीवर जोरदार बोलले. पण पक्षाचे इतर राज्यस्तरीय नेत्यांनी या यशाबद्दल फार उत्सुकता दाखविली नाही. हे नेते प्रदेश कार्यकारिणी समितीवर आपली वर्णी कशी लागेल, याच प्रयत्नात सध्या आहेत. 

कॉंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांत हाच फरक असल्याचे कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले. मिळालेल्या यशाबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक करणे आणि त्या यशाचे मार्केटिंग करणे, यात गांधी कुटुंबियाला फारसे स्वारस्य नसल्याचेही यातून दिसून येत असल्याचे हा नेता म्हणाला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com