मी आहे तेथेच, एवढा गहजब कशासाठी? : राधाकृष्ण विखे

 मी आहे तेथेच, एवढा गहजब कशासाठी? : राधाकृष्ण विखे

नगर : मी केलेल्या विधानांच्या अर्थाचा अनर्थ करू नका. मी आहे तेथेच आहे. मुख्यमंत्र्यांसोबत मैत्री असली, तरी विरोधी पक्षनेता म्हणून कामगिरी चोख आहे. विरोधी पक्षनेता व मुख्यमंत्री यांची मैत्री असल्याची अनेक उदाहरणे आहेत. पंतप्रधानदेखील पक्ष बाजूला ठेवून कुणाचा तरी सल्ला घेतातच ना ! मग माझ्या बाबतीत एवढा गहजब कशासाठी? असा प्रश्‍न विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी केला. 

विखे यांनी दोन दिवसांपूर्वी पुढाकार घेऊन शिर्डीत आयोजित केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या विधानावरून उठलेल्या गदारोळाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली. 

थोरातांवर टीकाश्र 
मधुकर पिचड यांनी "निळवंडे'च्या प्रश्‍नाबाबत केलेल्या टीकेकडे लक्ष वेधले असता विखे पाटील म्हणाले, ""ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. मी त्याबाबत काही बोलू इच्छित नाही. "निळवंडे' पुनर्वसनाबाबत त्यांनी पाठविलेल्या आपद्‌ग्रस्तांना मी नोकऱ्या देऊ केल्या होत्या. प्रवरा परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीदेखील त्यासाठी संपादित झाल्या आहेत.'' "आमच्या काही मित्रांनी एव्हाना बातम्यांची कात्रणे व चित्रफिती पक्षश्रेष्ठींकडे पाठविल्याही असतील,' अशा शब्दांत विखे यांनी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्याच वेळी माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आज त्यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देणे मात्र त्यांनी खुबीने टाळले. 

माझ्या विधानांचा विपर्यास 
कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात मी मंत्री असलो, तरी माझ्या मतदारसंघातील महत्त्वाची कामे मुद्दाम अडवून धरली जायची, असा आरोप करत विखे पाटील म्हणाले, ""समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे येथील शेतीची वाट लागली. त्या विरोधात मला मंत्रिपदपणाला लावण्याची वेळ आली. निधीअभावी गोदावरी कालव्यांची दुरवस्था झाली. पूर्वी अडविलेली मतदारसंघातील कामे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात मार्गी लावली. निळवंडे कालव्यांच्या कामासाठी निधीचा प्रश्‍न सोडविला. मग त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात काय गैर आहे? मी केलेल्या विधानांचा विपर्यास करण्यात आला. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना त्या वेळी माझी अडवणूक कशी केली जायची, हे माहीत आहे.'' 

संघर्ष यात्रेमुळेच शेतकरी जागा 
आम्ही काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे शेतकरी जागृत झाले. सरकारला कर्जमाफी जाहीर करावी लागली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व आम्ही घेतलेल्या परिश्रमामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका व महापालिकांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी केली, असा दावाही त्यांनी केला. काही लोक विधानसभेत गप्प बसतात. पक्षवाढीसाठी काही करीत नाहीत. केवळ माझ्या तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे पाठवितात, अशी टीका विखे पाटील यांनी पुन्हा केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com