बापटांना या `योगायोगा`ची अपेक्षा; तर गोगावलेंना त्या `परंपरे`चा आधार!

राजकारण तसे अस्थिरच असते. कोणत्या क्षणी काय घडेल सांगता येत नाही. त्यातून निवडणुकांचेजुने निकाल पाहिले की काही वाचनीय बाबी हाती लागतात. पुण्याच्या निवडणुकीचा आणि भाजपचा असाही डोळस इतिहास...
बापटांना या `योगायोगा`ची अपेक्षा; तर गोगावलेंना त्या `परंपरे`चा आधार!

पुणे : भारतीय जनता पक्षाची पुणे लोकसभा मतदारसंघासाठी कोणाला उमेदवारी मिळणार, याची शहरात उत्सुकता आहे. आतापर्यंत या शहरात लोकसभा निवडणुकीसाठी तीन वेळा कमळ फुलले. आता भाजपचा चौकार बसणार का, याबाबत कार्यकर्ते विविध गणिते मांडत आहेत. 

या पक्षाची उमेदवारी, विजय आणि पराभव याच्या काही `परंपरा` गेल्या तीस वर्षांपासून म्हणजे 1989 पासून लक्षात येतात. अर्थात या परंपरा म्हणजे उमेदवारी निवडण्याचे निकष नाहीत. अशा परंपरा पाहून कोणताही पक्ष आपले उमेदवार निवडत नाहीत. पक्षाचे 1991, 1999 आणि 2014 मध्ये खासदार झाले. यातील काही साम्ये लक्षात येण्यासारखी आहेत.

अण्णा जोशी यांनी भाजपकडून पहिल्यांदा 1991 मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली. तत्कालीन काॅंग्रेसचे दिग्गज नेते विठ्ठलराव गाडगीळ यांचा त्यांनी पराभव करून इतिहास रचला होता. अण्णांनी 1989 मध्येही गाडगीळ यांच्याविरोधत लढाई केली होती. मात्र त्यात अपयश आले होते. अण्णांना 1991 मध्ये पक्षाची उमेदवारी मिळाली तेव्हा ते भाजपचे शहराध्यक्ष होते. शहराध्यक्ष असूनही उमेदवारी मिळाली आणि ते खासदारही झाले.

असाच प्रकार 1999 मध्ये प्रदीप रावत यांच्याबद्दल झाला. ते तेव्हा पक्षाचे शहराध्यक्ष होते. त्यांना अचानक उमेदवारी मिळाली आणि ते खासदाही झाले. परत याचीच पुनरावृत्ती 2014 मध्ये झाली. अनिल शिरोळे हे 2014 च्या निवडणुकीच्या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष होते. त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आणि ते देखील खासदार झाले. शहराध्यक्ष नसताना लोकसभा निवडणूक लढविणारे पराभूत झाले, हे वेगळे सांगणे नकोच.

आता याच `योगायोगा`ची विद्यमान शहराध्यक्ष योगेश गोगावले वाट पाहत आहेत. त्यांनाही वाटते की शहराध्यक्ष असताना लोकसभेची उमेदवारी मिळाली की काम सोपे होईल. त्यामुळेच त्यांनी आपले मित्र पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह उमेदवारीच्या स्पर्धेत उडी घेतली आहे. 

भाजपने लोकसभेसाठी 1989 पासून एका उमेदवाराला फक्त दोनदाच संधी दिल्याचे दिसून येत आहे. 1989 आणि 1991 मध्ये अण्णा जोशींना उमेदवारी मिळाली. त्यात ते एकदा खासदार झाले. 1996 मध्ये त्यांची प्रबळ इच्छा असतानाही एक प्रकरण त्यांना भोवले. त्यातून कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आणि 1996 मध्ये बापट उमेदवार झाले.  मात्र बापट यांचा काॅंग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी पराभव केला.

त्यानंतर 1998 मध्ये पक्षाने काॅंग्रेसचे बंडखोर सुरेश कलमाडी यांना पाठिंबा दिला. 1999 मध्ये रावत खासदार झाले. त्यांना परत 2004 मध्ये उमेदवारी दिली. पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. 

शिरोळे यांना पक्षाने 2009 मध्ये उमेदवारी दिली. मात्र त्या पहिल्या प्रयत्नात शिरोळे यांना पराभव झाला. त्यांना 2014 मध्ये शहराध्यक्षच्या `योगायोगा`चा लाभ झाला. आता या फक्त दोन वेळा उमेदवारीच्या `परंपरे`नुसार शिरोळे यांना डावलले जाऊ शकते, असे काहीजण म्हणू शकतात.

गिरीश बापट यांना या दोन वेळा उमेदवारीच्या योगायोगाचा लाभ यंदा घ्यायचा आहे. त्यांना 1996 मध्ये उमेदवारी मिळाली. ते 2014 मध्ये लोकसभेसाठी प्रचंड इच्छुक असताना त्यांना डावलण्यात आले. आता ती डावललेली दुसरी संधी या वेळी मिळेल, असे त्यांचे समर्थक म्हणू शकतात. 

त्यामुळे भाजपचा शहराध्य़क्ष खासदार होण्याची परंपरा गोगावले यांच्यासाठी अनुकूल आहे, दोन वेळा उमेदवारी मिळण्याच्या `योगायोगा`चा बापट यांच्यासाठी लाभ ठरू शकतो. अर्थात या साऱ्या कथित परंपरा, योगायोग दूर सारून विद्यमान खासदारालाच उमेदवारी मिळू शकते किंवा नवीन चेहरा मिळाल्यासही आश्चर्य़ नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com