देशाची अर्थव्यवस्था नोटाबंदीमुळे खिळखिळी झाली : पृथ्वीराज चव्हाण

 देशाची अर्थव्यवस्था नोटाबंदीमुळे खिळखिळी झाली : पृथ्वीराज चव्हाण

कऱ्हाड : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा नोटाबंदीमुळे मोडला आहे. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस घसरते आहे. आर्थिक आघाडीवर मोदी सरकार अपयशी ठरले आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कऱ्हाडमध्ये केला. केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला त्याला आता दोन वर्षे झाली. तो दिवस म्हणजे नऊ नोव्हेंबर आहे. हा काळा दिवस म्हणून पाळून त्या विरोधात निदर्शने करण्याचे कॉंग्रेसने आयोजन केले होते. मात्र, नऊ तारखेला दिवाळी असल्याने त्या दिवशी निदर्शने न करता ते आंदोलन आज (ता.11) झाले. 

कऱ्हाड येथील कोल्हापूर नाक्‍यावर पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, शहराध्यक्ष आप्पा माने, तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख कायकर्ते उपस्थित होते. कऱ्हाड शहरात येणारा मार्ग अडवून येथे नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन करून काळा दिवस पाळण्यात आला. त्यामुळे आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी काळ्याफिती लावून आंदोलन केले. 
आंदोलनावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर जोरदार आरोप केले. 

श्री. चव्हाण म्हणाले, राफेल विमानाच्या खरेदीत झालेला भष्ट्राचारासह स्वायत्त संस्था म्हणून काम करणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेच्या कारभारासह सीबीआयच्या कामात होणारा हस्तक्षेप गंभीर आहे. नोटाबंदीचा फसलेल्या निर्णयापासून मोदी सरकार पूर्ण अपयशी ठरते आहे. त्यांच्या चुकलेल्या निर्णयामुळे देशाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्या निर्णयाच्या विरोधात आम्ही आवाज उठवत आहोत, दोन वर्षापूर्वी नऊ नोव्हेंबरला 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली होती. निर्णयानंतर देशातील 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या. 

श्री चव्हाण पुढे म्हणाले, नोटाबंदीला दोन वर्षे झाली आहेत. नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेल्याचं समोर आलं आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य व्यक्तींना त्रास झाला. ते कोणत्या धर्म, जाती किंवा पेशा, संप्रदायाचे असो. एखादी जखम झाल्यास ती भरून निघते. नोटाबंदीमुळे झालेली जखम दिवसेंदिवस अजून खोलवर जाताना दिसत आहे. नोटाबंदीमुळे जीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. राफेल विमानांच्या खरेदीतही घोटाळा आहे. 670 कोटींचे विमान प्रत्येकी 1670 कोटींच्या दराने खरेदी करतात. याचा खुलासा होण्याची गरज आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com