काश्‍मिरात जवानांवर दगडफेक करणाऱ्यांवर बॉम्ब हल्ला करा - तोगडिया

काश्‍मिरात जवानांवर दगडफेक करणाऱ्यांवर बॉम्ब हल्ला करा - तोगडिया

जळगाव : काश्‍मीरमध्ये भारतीय सैनिकांवर होत असलेली दगडफेक हे देशाविरुद्ध युद्धच आहे. त्यामुळे हल्ला करणाऱ्यावर एके 57 च्या गोळ्या झाडा आणि त्यातून ते ऐकणार नसतील तर त्यांच्यावर थेट बॉम्ब टाका असे उद्‌गार विश्‍व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.प्रवीणकुमार तोगडिया यांनी येथे काढले.

जळगाव येथे विश्‍व हिंदू परिषदेचा शिक्षा वर्ग व बजरंग दलाच्या शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. देशात हिंदूंची संख्या घटत असून मुस्लिमांची संख्या वाढत आहे त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणाचा समान नागरी कायदा करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली. 

जळगाव येथे सावखेडा शिवारात गेल्या दहा दिवसापासून विश्‍व हिंदू परिषदेचा शिक्षा वर्ग आणि बजरंग दलाचे शौर्य प्रशिक्षण सुरू होते. त्याचा आज सायंकाळी पाच वाजता त्यांचा समारोप झाला,यावेळी अध्यक्षस्थानी उद्योजक नीलेश सुरतवाला होते तर व्यासपीठावर फैजपूर सतपंथी आश्रमाचे महामंडलेश्‍वर जनार्दन महाराज, विहिंपचे क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर, वर्गाधिकारी हरीश हरकरे, बजरंग दलाचे वर्ग कार्यवाह धोंडिराम शिनगर उपस्थित होते.

यावेळी डॉ.तोगडीया म्हणाले, की काश्‍मिरात सेनेवर दगडफेक करणारे पाकिस्तानीच आहेत. जर देशातील सेनाच सुरक्षित नसेल तर या देशातील नागरिक सुरक्षित कसा असेल? पंजाबात अतिरेक्‍यांनी डोके वर काढल्यावर के.पी.एस गील या अधिकाऱ्यांनी तेथील अतिरेक्‍याचा बीमोड केला. तर तत्कालीन काश्‍मीरचे राज्यपाल जगमोहन यांनी त्यावेळी काश्‍मिरातही अतिरेक्‍यांना दणका दिला होता. त्यामुळे अशा कठोर अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करून सेनेवर हल्ला करणाऱ्याच्यांवर गोळ्या घालाव्या नाहीतर थेट त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करावा.भारत सरकारने ही हिंमत दाखवावी असे आवाहनही त्यांनी केले.

लोकसंख्या नियंत्रणाचा समान कायदा 
देशात हिंदूंची संख्या घटत असून मुस्लिमांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले. हिंदूंना लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आहे, परंतु मुस्लिमांना तो नाही.अशीच स्थिती राहिली तर भविष्यात मुस्लिमांची संख्या वाढेल आणि हिंदू अल्पसंख्याक होतील आणि काश्‍मिरात जी आज परिस्थिती आहे ती उद्या जळगाव, मुंबईतही येईल, त्यामुळे दोन मुलांचा समान नागरी कायदा संसदेत मंजूर करावा.

जर लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा पाळला नाही तर त्याचे रेशनिंग बंद करावे तसेच कठोर कारवाई म्हणून त्यांचा मतदानाचा हक्कच काढून घ्यावा. 


केंद्र सरकारवर चिंतन,राम मंदिरावर मौन 
केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्षे झाल्याबाबत त्यांना प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले, त्यांच्या या कालावधीतील कार्याबाबत कोणतेही मत प्रदर्शित करणार नाही. त्याबाबत आपले चिंतन सुरू आहे. ते संपल्यानंतर आपण अभ्यास करून त्यावर बोलणार आहोत.

राममंदिराच्या निर्माण कार्याबाबतही त्यांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला, केंद्र सरकारला दोन वर्षे बाकी आहेत, त्या कालावधीत मंदिर होईल काय? असा प्रश्‍न विचारला असता तो प्रश्‍न तुम्ही सरकारला विचारा असे त्यांनी स्पष्ट केले, मंदिर बांधण्याच्या तारखेबाबत आपण काहीच बोलणार नाही असेही त्यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती करावी 
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीबाबत ते म्हणाले, देशातील शेतकरी आज आत्महत्या करीत आहे. त्यामुळे त्याला कर्जमुक्ती करावी यासाठी शेती मालाला वाजवी दर, शेतीसाठी पाणी, काही प्रमाणात कर्ज माफी हे तीन पर्याय शासनाने करावे,

शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे उत्पादन दुपटीने वाढावे यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com