ये दोस्ती हम नही छोडेंगे.... जलील आणि प्रकाश आंबेडकरांचा निर्धार

 ये दोस्ती हम नही छोडेंगे.... जलील आणि प्रकाश आंबेडकरांचा निर्धार

औरंगाबाद : प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एमआयएम आणि बहुजन वंचित आघाडीने एकत्रित येऊन आगामी निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या तंबूत घबराट पसरली आहे. त्यामुळेच कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील लाल गुलाबांचा पुष्पगुच्छ घेऊन प्रकाश आंबेडकरांना भेटायला जात आहेत. अशोक चव्हाण, तुम्ही या पण एमआयएम नको अशी भूमिका घेत आहेत. पण पुण्यात झालेल्या अडीच तासांच्या बैठकीत एकमेकांची साथ सोडायची नाही असा निर्धार आम्ही केला असल्याची माहिती एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलतांना दिली. 

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएमची आघाडी करण्याचा निर्णय जवळपास निश्‍चित झाला आहे. औरंगाबाद येथे दोन ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या प्रकाश आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी यांच्या संयुक्त जाहीर सभेत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवू पाहणाऱ्या या सभेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. या संदर्भात जलील आणि आंबेडकर यांच्यात महत्वाची बैठक आज (ता. 25) दुपारी पुण्यात झाली. अडीच तासांच्या बैठकीत ही सभा आणि एमआयएम बहुजन वंचित आघाडीची दोस्ती भक्कम करण्यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत झाले. 

या बैठकी संदर्भात बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीने दलित आणि मुस्लिम समाजाचा फक्त राजकारण आणि मतांसाठी वापर करून घेतला आणि म्हणून आम्ही त्यांच्यापासून दूर जात आहोत. राज्यात एक नवे समीकरण आकाराला येत असल्याने कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणूनच त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना लाल गुलाबाचा पुष्पगुच्छ देऊन मैत्रीचा हात पुढे केला आहे. इतके दिवस त्यांना प्रकाश आंबेडकरांची आठवण आली नाही. 

एमआयएम नको म्हणणाऱ्यांकडे आम्ही गेलो का? 
प्रकाश आंबेडकरांनी चर्चेसाठी कॉंग्रेसला आमचे दरवाजे खुले आहेत असे विधान मुंबईत केले होते. त्यावेळी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी एमआयएम नको अशी भूमिका घेतली. मुळात आम्हाला तुमच्या सोबत घ्या असे म्हणायला आम्ही तुमच्याकडे आलो होतो का? असा उलट सवाल इम्तियाज जलील यांनी केला. 

मुळात तुम्हाला कंटाळूनच आम्ही नव्या आघाडीचा पर्याय उभा केला आहे. राज्यात आणि केंद्रात मुस्लिम, दलित मतांच्या जोरावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता भोगली, पण कधी तरी एखादा मुस्लिम खासदार निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले का ? असा प्रश्‍न उपस्थित करत आमचा निर्धार पक्का आहे, कुणी कितीही प्रयत्न केले तरी आमच्यात आता फूट पाडू शकत नाही असेही त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com