मराठ्यांनाच प्राधान्य दिल्याबद्दल कॉंग्रेसमधील  ओबीसी नेत्यांची राहुल गांधींकडे तक्रार 

काॅंग्रेसला आगामी काळात निवडणूक जिंकायची असेल तर ओबीसी नेतृत्त्वाला स्थान दिले पाहिजे, असा सूर काॅंग्रेसमधील ओबीसी नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे लावला आहे. साऱ्याच पदांवर मराठा नेते नेमून पक्ष हा ओबीसींकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार राहुल गांधींकडे करण्यात आली.
मराठ्यांनाच प्राधान्य दिल्याबद्दल कॉंग्रेसमधील  ओबीसी नेत्यांची राहुल गांधींकडे तक्रार 

पुणे : "कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, विधान सभेतील विरोधी पक्षनेते पद असो की विधान परिषदेतील उपसभापतिपद अशी सर्व प्रमुख पदे मराठा नेतृत्वाकडे देण्यात आली आहेत. महाराष्ट्रात मराठा ही प्रभावशाली जात असली तरीही इतर मागस वर्गीय (ओबीसी) ही निवडणुकीत निर्णायक कौल देणारी ठरते. याकडे पक्षश्रेष्ठींनी कायमच दुर्लक्ष केले आहे,'' अशा शब्दांत कॉंग्रेसच्या राज्यातील ओबीसी नेत्यांनी तक्रार केली आहे. 

पक्षाने आगामी निवडणुकीचा विचार करून सुधारणा करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत राज्यातील "ओबीसी' नेतृत्वाने पक्षश्रेष्ठींपुढे मांडल्याची माहिती पुढे आली आहे. 

कॉंग्रेसने आगामी निवडणुकीसाठी बेरजेच्या राजकारणाची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यासाठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाची आणि निवडणूक निर्णायक भूमिका बजावणारी इतर मागासवर्गीय जातीला पुन्हा कॉंग्रेसकडे खेचण्याचा प्रयत्न राष्ट्रीय पातळीवरून होत असल्याचे दिसते. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीमध्ये वेगवेगळ्या राज्यातील इतर मागास वर्गीय नेत्यांची बैठक घेतली. महाराष्ट्रातूनही पंधरा-वीस नेते या बैठकीला उपस्थित होते. त्यात पुण्यातील कॉंग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब शिवरकर आणि दीप्ती चवधरी उपस्थित होत्या. 

महाराष्ट्रात कॉंग्रेसने इतर मागासवर्गीय नेत्यांकडे, त्यांच्या कार्यकर्त्यांकडे कायम दुर्लक्ष केले आहे. मराठ्यांनाच प्राधान्य देण्याचे धोरण पक्षाने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ठेवले आहे. याबाबत थेट राहुल गांधी यांच्याकडे नाराजीचा पाढा वाचला. त्याला उदाहरण देताना सध्या राज्यात प्रदेशाध्यक्षपद अशोक चव्हाण यांच्याकडे आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तर; विधान परिषदेचे उपसभापतिपद हे माणिकराव ठाकरे यांच्याकडे असल्याचे सांगण्यात आले. यात इतर मागासवर्गीय नेतृत्वाला कुठे स्थान आहे, असेही सवालही काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना विचारला. 

पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रात मराठा या प्रभावी जातीकडेच लक्ष दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही जागा वाटप करताना कुणबी उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. मूळच्या इतर मागासवर्गियांना उमेदवारी मिळत नाही. त्याचा थेट परिणाम मतदानाच्या निकालातून दिसतो. महाराष्ट्रात मराठा आणि कुणबी सुमारे 30 ते 31 टक्के असून, "ओबीसी' जवळपास 40 ते 42 टक्के आहे. त्याच वेळी इतर पक्ष मुळच्या "ओबीसी' उमेदवारांना उमेदवारी देतात. त्यामुळे कॉंग्रेसपासून "ओबीसी' दुरावत आहे, असेही त्यांनी गांधी यांच्या लक्षात आणून दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com