चंद्रकांत खैरे बंदा रूपया, बाकी सगळे खुळखुळणारी चिल्लर- प्रा. नितीन बानगुडे पाटील

गेल्या वीस वर्षापासून सातत्याने औरंगाबादमधून लोकसभेवर निवडूण जाणारे खासदार चंद्रकांत खैरे हेच खरे बंदा रुपया आहेत. बाकी सगळे खुळखुळणारी चिल्लर, त्यांना मत देऊन ते वाया घालू नका, अशा शब्दांत शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी विरोधी उमेदवारांवर हल्ला चढवला.
चंद्रकांत खैरे बंदा रूपया, बाकी सगळे खुळखुळणारी चिल्लर- प्रा. नितीन बानगुडे पाटील

औरंगाबाद : गेल्या वीस वर्षापासून सातत्याने औरंगाबादमधून लोकसभेवर निवडूण जाणारे खासदार चंद्रकांत खैरे हेच खरे बंदा रुपया आहेत. बाकी सगळे खुळखुळणारी चिल्लर, त्यांना मत देऊन ते वाया घालू नका, अशा शब्दांत शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी विरोधी उमेदवारांवर हल्ला चढवला.

शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ सातारा-देवळाई परिसरात बानगुडे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आपल्या घणाघाती भाषणात त्यांनी विरोधकांच्या टिकेचा समाचार घेतला. अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचे नाव न घेता बानगुडे पाटील म्हणाले, "ज्याला पक्षच नाही असा एक अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. त्याला महत्व देण्याची गरज नाही. ज्यांचा पक्षच नाही अशा व्यक्तीला मतदान करून ते वाया घालवू नका. त्यांचा उद्या पंतप्रधान होणार आहे का? याचा विचार करा. राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अवस्था वाईट झाली आहे. त्यांना आपलेच लोक सांभाळता येत नाहीयेत. लग्न झाल्यावर मांडवात जशी दोन-चार लोक शिल्लक असतात असे चित्र सध्या कॉंग्रेस आघाडीमध्ये आहे. पंतप्रधान होण्यासाठी २७२जागा निवडूण याव्या लागतात. पण विरोधक तेवढ्या जागा तरी देशात लढवतायेत का. अनेक पक्ष एकत्र येऊन केलेली आघाडी मोदींच्या विरोधात लढते आहे."

ते पुढे म्हणाले, "पण शिवसेना-भाजप एकत्र आली तर त्यांच्या पोटात दुखते. आम्ही सत्तेत असतांना विरोध केला, राजीनामे खिशात आहेत का? अशी टिका आमच्यावर केली गेली. पण आम्ही सरकारच्या विरोधात नाही तर जनतेच्या बाजून बोलत होतो. हो आमच्या खिशात राजीनामे अजूनही आहेत.  पण कॉंग्रेस-राष्ट्रवादीला त्याची एवढी काळजी का वाटते? पाण्यावाचून जसा मासा तडफडतो तशी कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेवाचून तडफडत आहे. म्हणूनच आम्ही केव्हा राजीनामे देतो आणि ते सत्तेत येतात याकडे त्यांचे लक्ष होते. खिशातल्या राजीनाम्याच्या जोरावरच शिवसेनेने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला, शेतीमालाला हमी भाव आणि राममंदीराचा प्रश्‍न ऐरणीवर आणला," जर देश विकणारे एकत्र येऊ शकतात, तर देश वाचवणारे एक होऊ शकत नाही का? असा सवाल देखील बानगुडे पाटील यांनी उपस्थितांना केला.

शत्रूशी गन की बात
"नरेंद्र मोदी यांच्या मन की बात वर विरोधक टिका करतात, पण देशातील जनतेशी मन की बात आणि शत्रूशी गन की बात या देशाच्या पन्नास वर्षात फक्त मोदींनी केली. दुसरीकडे कॉंग्रेसने कश्‍मिरातील ३७० कलम रद्द होऊ देणार नाही असे आश्‍वासन आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. हे कलम रद्द झाल्याशिवाय कश्‍मिर भारताचा अविभाज्य भाग आहे असे आपण म्हणून शकत नाही. त्यामुळे ते रद्द झालेच पाहिजे. तेव्हा दर आठवड्याला जनतेसाठी नव्या योजना आणणारे मोदी सरकार हवे की दर आठवड्याला नवा घोटाळे करणारे कॉंग्रेस आघाडीचे याचा विचार मतदारांनी करण्याची वेळ आली आहे," असे आवाहन देखील बानगुडे यांनी यावेळी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com