"राष्ट्रवादी युवा'ची आता लवकरच परिवर्तन यात्रा

"राष्ट्रवादी युवा'ची आता लवकरच परिवर्तन यात्रा

नगर : भाजप सरकारने युवकांसाठी दोन कोटी रोजगाराची घोषणा केली. प्रत्यक्षात नोटाबंदीमुळे अनेक युवक बेरोजगार झाले. 20 लाख युवकांनाही रोजगार देता आला नाही. सरकारच्या योजना फसव्या आहेत. ते बुद्धिभेद करण्याचे राजकारण करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने राज्यातील 125 मतदार संघात परिवर्तन यात्रा काढणार आहे.

त्यासाठी नियोजन सुरू असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 


कोते यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या युवा आघाडीचे नियोजन स्पष्ट केले. दिवाळीनंतर संघटना आक्रमक होईल असे सांगताना ते म्हणाले, ""सरकारने सुडबुद्धीचे राजकारण करून सर्वांनाच फसविले आहे. त्यातल्या त्यात युवकांची घोर उपेक्षा केली आहे. विद्यार्थी चळवळी लोप पावण्याची शक्‍यता असताना आम्ही राज्यभरात 43 मोर्चे काढून युवा संघटन केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडली. 

भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वी युवाधोरण जाहीर केले होते. नोकऱ्या व स्वतःच्या व्यवसायाच्या माध्यमातून युवक स्वतःच्या पायावर उभे राहतील, असे सांगितले होते. मात्र झाले उलटेच. नोकरीही नाही आणि व्यवसायही नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. 

सध्याचा व्यापारच अडचणीत असताना नवीन उद्योग उभे करण्याचे धाडस युवक कसे करतील. नोकऱ्या नसल्याने गावागावांत अनेक बेरोजगार नुसतेच फिरत आहेत. उच्च शिक्षण घेऊनही उपयोग होत नसेल, तर सरकारने कशाची वचनपूर्ती केली.'' 


राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आगामी काळात आक्रमक होणार आहे. मेळावे, चर्चासत्रे, मोर्चे आदींच्या माध्यमातून युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर परिवर्तन यात्रा काढण्याचे नियोजन आहे, असे कोते यांनी सांगितले. 

फसव्या योजना कशासाठी 
सर्वसामान्य, शेतकरी तसेच युवकांसाठी विविध योजना सरकार जाहीर करते. प्रत्यक्षात लाभ किती जणांना मिळतो, हे अभ्यासण्याचा विषय आहे. योजना जाहीर होते; परंतु त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचतच नाहीत. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याच्या घोषणा केल्या होत्या. त्या आता हवेत विरल्या. मराठा, धनगर आरक्षणाच्या विषयांचेही तेच झाले. अशा फसव्या योजना जाहीर करून सरकार फक्त प्रसिद्धीचा स्टंट करीत असल्याचा आरोप कोते यांनी केला. 
दोन संग्राम अन्‌ एक राहुल 
श्रीगोंदे मतदार संघाचे आमदार आमदार राहुल जगताप, नगर शहर मतदार संघाचे आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते हे तीन तरुण चेहरे राष्ट्रवादीसाठी नगर जिल्ह्यातील युवकांची फळी उभी करीत आहेत.

आगामी काळात युवकांच्याच माध्यमातून आक्रमक धोरण ठरवून प्रश्‍न सोडविण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांची साथ युवकांना राष्ट्रवादीकडे खेचण्यासाठी कामी येत आहे.

श्रीगोंदे येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आमदार राहुल जगताप व कोते यांनी एकत्रित चर्चा केली. त्यामध्ये पक्षवाढीसाठी नियोजन करण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com