कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी नक्की होणार : पृथ्वीराज चव्हाण

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी नक्की होणार : पृथ्वीराज चव्हाण

कऱ्हाड : आगामी निवडणुकात राष्ट्रवादीशी आमची आघाडी नक्की होणार आहे. त्यात चारच जागांवर आमची बोलणी सुरू आहे. तीही खेळीमेळीत पार पडेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व्यक्त केला. यावेळी आम्ही एमआयएमला सोबत घेणार नसल्याचे सांगताना प्रकाश आंबेडकर यांना घेण्यासाठी आम्ही अनुकूल आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

श्री. चव्हाण यांनी आज कऱ्हाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभेसाठी 26 व 22 तर विधानसभेसाठी 161 व 128 चा फार्म्युला आम्ही कायम ठेवणार आहोत. त्याच पद्धतीने आमची बोलणी सुरू असून बोलणी यशस्वी होईल. त्यामुळे आघाडी नक्की होईल. ज्या जागांवर बोलणी सुरू आहेत. त्या जागा अत्यंत खुलेपणाने व खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यातही काही अडचण येईल, असे वाटत नाही. एमआयएमसारख्या पक्षाला आम्ही तरी बरोबर घेणार नाही. मात्र, प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेण्यास आम्ही तयार आहोत. प्रकाश आंबडेकरांनी कोणाबरोबर जायचे व कोणाला विरोध करायचा हा त्यांचा प्रश्न आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला राष्ट्रवादी सोबत घेत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला तरी अजून त्यातील काही माहिती नाही. 
दुष्काळी उपाययोजनांबाबत सरकारची चालढकल 
राज्यावर दुष्काळाचे गंभीर सावट आहे. अशात दुष्काळग्रस्त म्हणून जास्त तालुके येऊ नयेत असे महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न दिसत आहेत. दुष्काळी भागाला उपाययोजना देण्याऐवजी चालढकल केली जात आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते म्हणाले, 2016 मध्ये केंद्र सरकारने दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्य सरकारने सात ऑक्‍टोबर 2017 ला अध्यादेश काढला आणि त्याप्रमाणे दुष्काळ ठरविण्याची पद्धत जाहीर केली. त्यानुसार मध्यंतरी 171 तालुके दुष्काळसदृश्‍य जाहीर केले. मुळातच सदृश्‍य हा शब्द वापरता येत नाही किंबहुना गोंधळ निर्माण करणारा आहे. त्यामध्येच 31 ऑक्‍टोबरला 151 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. पर्जन्यमान, जमिनीतील ओलाव्याची स्थिती, उपग्रहातून दिसणारी हिरवळ, त्यांच्या अंतर्गत पाहणी करून सुरवातीला दोनशे तालुके नंतर 171 तालुके आणि आता 151 तालुके दुष्काळग्रस्त असल्याचे सांगत आहेत. आंध्रप्रदेशने आठ ऑगस्टला तसेच कर्नाटक सरकारने 14 सप्टेंबरला त्यांच्या राज्यात दुष्काळ जाहीर केला व उपाययोजना सुरू केल्या. महाराष्ट्र सरकारने दुष्काळ जाहीर करून उपाययोजना सुरू करण्यास दिरंगाई केली. दुष्काळाबाबतीत सरकार गंभीर नाही. जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत साडे सात हजार कोटी रुपये खर्च करून 16 हजार गावे दुष्काळमुक्त झाली असे पंतप्रधान मोदी यांनी शिर्डी येथील कार्यक्रमात सांगितले होते. मग राज्यात एवढा भीषण दुष्काळ का पडला, हा सामान्य लोकांचा प्रश्न आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com