घरून निघताना पत्नी म्हणते,संयमाने वागा कोणावर रागवू नका : नारायण राणे 

Mrs. Neelam & Narayan Rane
Mrs. Neelam & Narayan Rane

मुंबई :" मी आक्रमक वागतो,परखड वागतो ही वस्तुस्थिती आहे. मात्र  मी त्यामुळे अडचणीत आलो असे मला वाटत नाही. पत्नी -मुले तसे मला बोलतात . माझी  पत्नी मला  कोणावर रागवू नका  , कोणाला तोडू नका,  संयमाने वागा असे मला दररोज सांगते . याचा अर्थ मी काही रोज भांडतो असे नाही . पण माझा स्वभाव असा त्यामुळे आपण शांत केलेले बरे असे त्यांना वाटत असेल ," असे माजी मुख्यमंत्री आणि वादळी नेते नारायण राणे यांनी 'साम वाहिनी'ला दिलेल्या खास मुलाखतीत  बोलताना सांगितले . 

आपल्या पत्नी  सौ .  निलम राणे  यांची  आपल्याला  जीवनाच्या वाटचालीत भक्कम साथ लाभली असेही त्यांनी मुलाखतीत सांगितले . आपल्या परखड आणि स्पष्टवक्तेपणामुळे आपण अडचणीत येत नाहीत का असे विचारले असता नारायण राणे यांनी वरील उत्तर दिले . 

नारायण राणे यांनी कौटुंबिक विषयांपासून ते राजकारणापर्यंत अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली . 

राजकारणाच्या धावपळीमुळे कुटुंबियांसाठी फारसा वेळ देता येतो का असे विचारले असता नारायण राणे म्हणाले, " मी राजकारणात असूनही माझ्या वेळेचे नियोजन करतो . माझा दिनक्रम नियोजनबद्ध असतो . मी दुपारचे असो की रात्रीचे जेवण शक्यतो घरीच घेण्याचा प्रयत्न करतो . रात्री नऊ नंतर मी बाहेर नसतो . कधी रात्री जेवणासाठी बाहेर जायचे असेल तर आधी पत्नीच्या कानावर घालतो . फक्त निवडणुकांचा अपवाद वगळला तर मी रविवारचा वेळ कुटुंबियांसाठी राखीव ठेवतो . कुटुंबियांसाठी पुरेसा वेळ देण्याचा माझा प्रयत्न  असतो ."

आपली मुले राजकारणात आहेत, आता नातवंडेही राजकारणात यावेत असे आपल्याला वाटते का ? असे विचारले असता श्री. राणे म्हणाले, " मुळीच नाही. माझया नातवंडांनी राजकारणात येऊ नये . माझ्या मुलांना आणि सुनांनाही तिसरी पिढी राजकारणात नको वाटते . माझ्या नातवंडांनी उद्योग व्यवसायात जावे ." 

नारायण राणे राजकारणात आले नसते तर काय झाले असते यावर बोलताना ते म्हणाले, " मी राजकारणात आलो नसतो तर इनकम टॅक्स खात्यात फार तर हेड क्लार्क म्हणून रिटायर झालो असतो . पण माझा नौकरीचा पिंडच नव्हता . " 

आपल्या आई वडिलांच्या आठवणी भावुक होऊन सांगताना श्री. राणे म्हणाले, " माझ्या  वडिलांना मी आबा म्हणत असे . माझे वडील जरा रागीट होते त्यांना पटले नाही तर पटकन बोलायचे .  मी नगरसेवक पदासाठी अर्ज भरण्यापूर्वी गावी आलो . आईच्या कानावर घातले . आबांना विचारायला गेलो. तेंव्हा त्यांनी मला  राजकारणात पडू नको, सरकारी नोकरी सोडू नको असे बजावून सांगितले. मात्र वडीलांच्या पुढे उलट बोलू नये असा कोकणात नियम असल्यामुळे मी काही बोललो नाही.फक्त आईला सांगून निवडणूक लढविली.निवडून आल्यावर  मी पुन्हा गावी गेलो. वडिलांना भेटलो तेंव्हा ते मला म्हणाले,  हट्ट पूर्ण केलास अखेर ?    आई मात्र प्रेमळ होती . माझ्या राजकीय यशात आई नेहमी आनंदी राहिली . वडील लवकर गेल्यामुळे त्यांचा सहवास जास्त लाभला नाही, पण आईने मला मुख्यमंत्री झालेले पाहिले . तेंव्हा आईला खूप आनंद झाला होता . "

आयष्यात एखादी गोष्ट करायची राहून गेली असे आपल्याला वाटते का असे विचारले असता ते म्हणाले, " मला असे काहीही वाटत नाही .मी माझ्या  जीवनाबाबत समाधानी आहे .  मी ऐटीत आणि रुबाबात जगलो . परमेश्वर कृपेने मी स्वाभिमानाने आणि ताठ मानेने जगलो .  संकटांना डगमगलो नाही .  माझा विचारच असा राहिला की ईश्वराने मला संकटे जरूर द्यावीत पण ती संकटे दूर करण्याचे सामर्थ्य देवाने मला द्यावे . संकटे कोणावर येत नाहीत ? माझ्यावरही खूप संकटे आली पण मी न डगमगता लढलो . " 

अवश्य वाचा :

नारायण राणेंच्या घरी टॅक्सीने जाणारे ते मंत्री पुन्हा का आले नाहीत ? http://www.sarkarnama.in/narayan-rane-bjp-entry-drama-37085

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com