राष्ट्रवादी कोणत्या माजी आमदाराला देणार लोकसभेचे तिकीट? 

राष्ट्रवादी कोणत्या माजी आमदाराला देणार लोकसभेचे तिकीट? 

नगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात मोर्चेबांधणी सुरू आहे. भारतीय जनता पक्ष व शिवसेना स्वतंत्र लढण्याच्या मनःस्थितीत आहे, तर कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसची आघाडी होण्याचे घाटत आहे. आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने पक्षाच्या नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

शिवसेना व भाजपच्या मतांवर मागील दोन टर्म निवडून आलेले खासदार दिलीप गांधी यांनी पुन्हा उमेदवारी केल्यास त्यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीकडून माजी आमदार दादा कळमकर किंवा माजी आमदार नरेंद्र घुले यांची नावे चर्चेत येवू लागली आहेत. 

अहमदनगर लोकसभा मतदार संघ हा जिल्हापातळीवर दक्षिण लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघावर भाजपची पकड आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसला मागील दोन्हीही टर्ममध्ये भाजपच्या गांधी यांच्या मताच्या जवळही जाता आले नाही. त्यामुळे पुढील निवडणुकीत गांधी यांना राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण असेल, याबाबत खलबते सुरू आहेत. 

1999 च्या लोकसभा निवडणुकीत दिलीप गांधी निवडून आल्यानंतर भाजपची पकड या मतदारसंघावर राहिली. त्यानंतरच्या म्हणजे 2004 च्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी कॉग्रेसचे तुकाराम गडाख यांनी बाजी मारत निवडणूक जिंकली होती. पुढे या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवण्यात ते अयशस्वी झाले.

त्यानंतर म्हणजे 2009 च्या निवडणुकीत भाजपच्या दिलीप गांधी यांनी पुन्हा बाजी मारत तीन लाख 12 हजार 47 मते मिळविली. या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार शिवाजी कर्डिले दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना दोन लाख 65 हजार 316 मते मिळाली होती. या निवडणुकीत राजीव राजळे यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. त्यांना एक लाख 52 हजार 795 मतांवर समाधान मानावे लागले होते. त्यावेळी राजळेसमर्थकही राष्ट्रवादीला मानणारे होते. कर्डिले व राजळे यांच्या मतांची बेरीज केल्यास सुमारे चार लाख होते. म्हणजेच राजळे यांची उमेदवारी नसती तर कदाचित कर्डिले यांना विजयश्री खेचता आली असती. 

2014 च्या निवडणुकीत भाजपचे खासदार दिलीप गांधी यांना सहा लाख पाच हजार 185 , तर राष्ट्रवादी कॉग्रेसचे राजीव राजळे तीन लाख 96 हजार 63 मते मिळाली होती. आम आदमी पार्टीच्या उमेदवार अभिनेत्री दीपाली सय्यद यांना सात हजार 120 मते मिळाली होती. गांधी यांनी राजळे यांचा तब्बल दोन लाख नऊ हजार 122 मताधिक्‍यांनी पराभव केला होता. या निवडणुकीत राजळे यांच्या मतांची आकडेवारी वाढली असली, तरी गांधी यांच्या मतांमध्ये दुप्पटीने वाढ झाली. 

मागील निवडणुकांत शिवसेना व भाजप यांच्यात युती कायम होती. आगामी निवडणुकीत शिवसेनेने स्वतंत्र लढण्याची घोषणा केली असली, तरी आगामी वर्षभरात अनेक बदल घडण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेने वेगळी चूल मांडल्यास त्याचा फटका भाजपच्या खासदार गांधी यांना बसू शकतो. 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची जागा कॉग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातील युतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसकडून माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार दादा कळमकर यांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत. दादा कळमकर हे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्षपद घुले कुटुंबियांकडे असल्याने नरेंद्र घुले यांना त्याचा फायदा होऊ शकतो, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com