मुंबईकरांना मी बांधील; अन्य नेत्यांनी यात पडू नये : उद्धव ठाकरे

मुंबईकरांना मी बांधील; अन्य नेत्यांनी यात पडू नये : उद्धव ठाकरे

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत उद्धव आज सविस्तरपणे बोलले पण इतर नेत्यांनी लुडबूड करू नये, असेही सांगितले.

मुंबई : " शिवसेनेला "पटकणारा' अद्याप जन्माला यायचा आहे, आम्हाला लेचेपेचे समजू नका,' असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजप अध्यक्ष अमित शहा यांना दिला. स्थानीय लोकाधिकार समितीच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

""विकासकांकडून येणारे 300 ते 350 कोटी अद्याप बाकी आहेत. मात्र, तोटा हजार बाराशे कोटींचा आहे. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आणि मुंबईकरांना मी बांधील असून, ज्यांचा याच्याशी संबंध नाही, त्यांनी यात पडू नये,'' असा इशारा ठाकरे यांनी अन्य राजकीय नेत्यांना बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत दिला. 

शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कलगीतुरा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शहा यांनी शिवसेनेबरोबर युती झाली तर ठीक; अन्यथा "शिवसेने को पटक देंगे' असा इशारा दिला होता. शाह यांना आज ठाकरेंनी उत्तर दिले. ते म्हणाले, ""शिवसेनेसाठी देश महत्त्वाचा आहे. आम्ही लेचेपेचे नाहीत. आम्हाला पटकणारा जन्माला यायचा आहे. देशात कोणतीही लाट येऊ दे, लाटांचा आमच्यावर काहीच परिणाम होत नाही.'' 

ठाकरे म्हणाले, ""शिवसेनेमुळे मराठी माणसाला ताकद कळाली. घोषणेतला फोलपणा दाखविणे म्हणजे टीका करणे नव्हे. युती झाली तर कुणाच्या जागा वाढतील यापेक्षा निवडणुकीत जय पराजयापेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा आहे.'' कर्जमाफीचा आम्ही पर्दाफाश केल्याचा दावा ठाकरे यांनी केला. ""शिवसेनेला स्वतःची नाही तर देशाची चिंता आहे. निवडणुका देव, देश आणि धर्मासाठीच लढल्या पाहिजेत,'' असे ते म्हणाले. ""राम मंदिराचा मुद्दा जुमला आहे का? राम मंदिर हा न्यायालयाचा विषय होता, मग मते का मागितली? त्यामुळेच राम मंदिराचा मुद्दा शिवसेनेने निवडणुकीपूर्वीच घेतला आहे,'' असे ठाकरे म्हणाले. 

अवास्तव मागण्या नकोत 
बेस्ट कर्मचाऱ्यांनी अवास्तव मागण्या केल्यास अनेक समस्या निर्माण होतील, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. ""राजकीय नेते आणि कर्मचारी संघटनांनी एकमेकांवर आरोप करून काही होणार नाही. आधी मान्यताप्राप्त युनियन आणि प्रशासनाने करार केले होते, त्यानुसार वेतन मिळत आहे. संपाबाबत आम्ही सर्वांसोबत चर्चा केली, मात्र काही तोडगा निघाला नाही. बजेटचे विलीनीकरण करण्याचे आश्वासन मी दिले होते ते पूर्ण करू. यावर एकत्रित बसून चर्चा केली तर मार्ग निघेल.

संपाचा निर्णय आता कोर्टाकडे आहे, तरीही माझी गरज असेल तर चर्चेला तयार आहे. बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक उपाययोजना आहेत. त्या करायला हव्यात. बेस्टच्या संपात राजकारण आणण्याची माझी इच्छा नाही. बेस्टची तिजोरी ही रिकामी झालेलीच आहे, त्यामुळे अवाजवी मागण्या केल्या तर अजून समस्या निर्माण होतील. बेस्टचे खासगीकरण हा अंतिम पर्याय नाही,'' असे ठाकरे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com