मराठा आरक्षणासाठी सहा आमदारांनी दिलेले राजीनामे ठरले स्टंटबाजी

मराठा आरक्षणासाठी सहा आमदारांनी दिलेले राजीनामे ठरले स्टंटबाजी

पुणे : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राजीनामा दिलेल्या सहा आमदारांपैकी एकाही आमदाराचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी मंजूर केला नसल्याचे समोर आले आहे. राजीनामा देताना विधानसभा अध्यक्षांकडे स्वत: उपस्थित राहून विहित नमुन्यात दिलेला राजीनामा मंजूर करण्यात येतो.

या सहा आमदारांनी केवळ कोऱ्या कागदावर कारणासह टाईप केलेले राजीनामे पाठविल्याने त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले नाहीत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नांवरून सहाजणांनी दिलेले राजीनामे केवळ स्टंटबाजी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. 


दोन महिन्यांपूर्वी मराठा आंदोलन राज्यभर पेटले होते. या काळात मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आमदार दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन जाधव, चिकटगावकर, रमेश कदम, भारत भालके व अब्दुल सत्तार यांनी राजीनामे दिले होते. वास्तविक या सहाही आमदारांना राजीनामा देण्याची पद्धत माहिती होती. कोणत्या स्वरूपात राजीनामे दिले तर ते मंजूर होतात याची माहिती आमदार या नात्याने या सर्वांनाच माहिती असणे अपेक्षित होते. मात्र तरीही विहित नुमन्यात राजीनामा न देता केवळ एक औपचरिकता म्हणून मराठा आरक्षण मिळावे, असे  कागदावर लिहून राजीनामे देण्यात आले.

विहित नमुन्यात आलेल्या राजीनामापत्राची दखल अध्यक्षांच्या कार्यालयाकडून घेण्यात येते. अशाप्रकारे केवळ औपचारिकता म्हणून कोऱ्या कागदावर आलेल्या राजीनाम्यावर अध्यक्षांच्या कार्यालयाकडून कोणतेही उत्तर दिले जात नाही, असे या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. राज्य सरकारच्या एकुण कारभाराचा निषेध करीत गेल्या आठवड्यात आमदार अशिष देशमुख यांनी राजीनामा दिला. आमदार देशमुख यांनी दिलेला राजीनामा विहित नमुन्यात दिला होता तसेच त्यांनी स्वत: उपस्थित राहून विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्यामुळे तो तत्काळ मंजूर करण्यात आला. देशमुख यांनी दिलेल्या राजीनाम्याप्रमाणे वरील सहा आमदारांनी विहित नुमन्यात राजीनामे दिले असते तर ते स्वीकारण्यात आले असते. मग या आमदारांनी जाणीवपूर्वक विहित नुमन्यात राजीनामे न देता केवळ स्टंटबाजी केली का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 

मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात राजीनामा दिलेल्या एकाही आमदाराने त्यानंतर आरक्षण देण्याबाबत सरकारने सुरू केलेल्या प्रक्रियेचा पाठपुरावा केल्याचे दिसत नाही, असे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. आरक्षण देण्यासाठी आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने नोव्हेंबरपर्यंतची वेळ मागून घेतली आहे. मात्र या मधल्या काळात राज्य सरकारकडून काय प्रक्रिया सुरू आहे, याची माहिती यातील कोणत्याच आमदाराने घेतलेली दिसत नाही, असे कोंढरे यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, या संदर्भात संपर्क साधला असता आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, ""मराठा, धनगर, लिंगायत व मुस्लीमांना लवकरात लवकर आरक्षण मिळावे या प्रामाणिक हेतूने राजीनामा दिला आहे. राजीनामान्याबाबत हिवाळी अधिवेशनात निर्णय होईलच. मात्र आमच्या राजीनाम्यावर चर्चा करण्यापेक्षा सरकारने ज्या कारणासाठी आम्ही राजीनामे दिले त्याचा विचार करून लवकरात लवकर आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा.'' 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com