महापालिकेतील ' मला किती मिळणार ' वृत्तीमुळे शहरात कचराकोंडी-आमदार इम्तियाज जलील 

महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी 25-30 वर्षात काय xxमारली? हा खरा प्रश्‍न आहे. केवळ कचऱ्याचे कंत्राट आपल्या मर्जीतील ठेकेदाराला कसे मिळेल, आणि त्यातून मला किती मिळणार याचाच विचार या दोन्ही पक्षांनी वर्षानुवर्ष केला.
MLA-Imtiaj-Jaleel
MLA-Imtiaj-Jaleel

औरंगाबाद : " महापालिकेतील "मेरा क्‍या' या वृत्तीमुळे आज शहरातील 15 लाख नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवणाऱ्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना 25-30 वर्षात कचऱ्यावर प्रक्रिया करणारा साधा प्रकल्प उभा करता आला नाही यापेक्षा दुर्दैव काय असू शकते. सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या पापाची शिक्षा आज शहरवासिय भोगत आहेत ,"असा   आरोप आमदार इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलतांना केला. 

नारेगांवच्या नागरिकांनी डेपोमध्ये कचरा आणण्यास विरोध दर्शवल्यामुळे शहरात पाच दिवसांपासून कचराकोंडी झाली आहे. महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहरावर ही वेळ आल्याची टिका आता सर्वसमान्यांकडून होत आहे. औरंगाबाद मध्य मतदारसंघाचे आमदार इम्तियाज जलील यांनी या सगळ्या प्रकारा बद्दल संताप व्यक्त केला. 

ते म्हणाले, "महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी 25-30 वर्षात काय xx  मारली? हा खरा प्रश्‍न आहे. केवळ कचऱ्याचे कंत्राट आपल्या मर्जीतील ठेकेदाराला कसे मिळेल, आणि त्यातून मला किती मिळणार याचाच विचार या दोन्ही पक्षांनी वर्षानुवर्ष केला आणि त्याचे परिणाम आज जनतेला भोगावे लागत आहेत. "

"तुमच्याकडे शहरातील कचरा गोळा करून तो साठवण्याची व्यवस्थाच नाही आणि तुम्ही प्लॉंट पाहण्यासाठी विदेशाचे दौरे करता हे हास्यास्पद आहे. कोट्यावधी रूपये खर्चून देखील अद्याप शहराच्या अनेक भागातून कचरा उचलला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. केवळ कमिशन आणि कागदोपत्री कचरा उचलल्याचे दाखवून कंत्राटदाराला बीले दिली जातात. "

कचऱ्याच्या वजनानूसार पैसे अदा करा 

आमदार जलील पुढे म्हणाले , " शहरातील कचऱ्यातून 25-30 वर्षात सत्ताधाऱ्यांनी कोट्यावधींची मलाई खाली. शिवसेना-भाजप हे दोघेही त्यात भागिदार होते. त्यामुळे आता कचऱ्याचा पक्ष आमचा नाही असे म्हणत जर कुणी जबाबदारी झटकत असेल तर ते चूकीचे आहे. महापालिका आयुक्तांना मी एक प्रस्ताव दिला होता. लोणावळा येथील कचरा डेपोमध्ये शहरातून दररोज किती गाड्यांमधून किती टन कचरा आला याचे वजन केले जाते आणि त्यानूसार कंत्राटदाराला पैसे दिले जातात. कचरा डेपोवर लावलेल्या सीसीटीव्हीद्वारे यावर नजर ठेवली जाते. कचऱ्याच्या वजनानूसार पैसे मिळत असल्यामुळे कंत्राटदार देखील शहरातल्या कान्याकोपऱ्यातून कचरा उचलून आणतो. "
 

" त्यामुळे शहर स्वच्छही होते आणि त्यात भ्रष्टाचार देखील होत नाही. तशी व्यवस्था आपल्याकडे करावी आणि झोन करून त्या भागातला कचरा तिथेच नष्ट करावा अशी संकल्पना होती. पण त्यावर महापालिकेने काहीच विचार केलेला नाही. सगळ्या शहराचा कचरा तुम्ही एकाच ठिकाणी जमा करणार असाल तर त्याला विरोध होणारच. त्यामुळे नारेगांववासियांसह आमदार संजय सिरसाट, संदीपान भुमरे यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. तुमच्या घरातला कचरा दुसऱ्याच्या घरात का? म्हणून सहन करायचा?" असा सवाल देखील इम्तियाज जलील यांनी यावेळी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com