विदर्भासाठी फडणवीस भांडतात, उत्तर महाराष्ट्रासाठी खडसेंनी भांडावे : दादा भुसे

विदर्भासाठी गडकरी, फडणवीस भांडतात, उत्तर महाराष्ट्रातही ही भावना जागली पाहिजे, हा संकेत देत सध्या भाजपच्या उपेक्षेमुळे राजकीय प्रवाहातुन खडसे दुर आहेत; त्यांनी उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करावे असे आवाहन शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी येथे केले. एकंदरच भाजप वगळता सगळ्याच पक्षांनी खडसेंना नेतृत्वाचे आवाहन केल्याने त्याची चर्चा होऊ लागली आहे.
विदर्भासाठी फडणवीस भांडतात, उत्तर महाराष्ट्रासाठी खडसेंनी भांडावे : दादा भुसे

मालेगाव : विदर्भासाठी गडकरी, फडणवीस भांडतात, उत्तर महाराष्ट्रातही ही भावना जागली पाहिजे, हा संकेत देत सध्या भाजपच्या उपेक्षेमुळे राजकीय प्रवाहातुन खडसे दुर आहेत; त्यांनी उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करावे असे आवाहन शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी येथे केले. एकंदरच भाजप वगळता सगळ्याच पक्षांनी खडसेंना नेतृत्वाचे आवाहन केल्याने त्याची चर्चा होऊ लागली आहे. 

सध्या एकनाथ खडसे सत्तेपासून बाजूला आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकांचे वारे वाहु लागल्याने भाजपच्या विरोधकांमध्ये मात्र खडसेंचे महत्व वाढू लागले आहे. यामध्ये शिवसेनाही मागे नाही. शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांनी खडसेंना उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले आहे. 

काँग्रेसचे जेष्ठ नेते, बाजार समितीचे माजी सभापती प्रसाद हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा झाला. यावेळी माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे, शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे, आमदार सुधीर तांबे, माजी आमदार अनिल आहेर, संजय चव्हाण, जगन्नाथ धात्रक, दिलीप बोरसे, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, उपसभापती राघो अहिरे, उपमहापौर सखाराम घोडके अशी सर्व पक्षीय मंडळी एकत्र आली होती. 

एव्हढी नेते मंडळी त्यात लोकसभा, विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार असतील तर राजकीय संकेत, सुचक वक्तव्ये आणि विधाने ओघाने होतातच. मात्र या मेळाव्यात भाजपच्या विरोधकांनी खडसे यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांना थेट उत्तर महाराष्ट्राच्या पाणी, शेती आणि राज्य शासनाच्या उपेक्षेविरोधात नेतृत्व करण्याचे आवाहन केले. त्यामुळे या मेळाव्याची अनेकांनी दखल घेतली आहे.

यावेळी खडसे यांनीही आपल्या मनातील सल शब्दांत व्यक्त केली. ''कर्मवीर भाऊसाहेब हिरे, बाळासाहेब चौधरी, प्रतिभाताई पाटील, रोहिदास पाटील, बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले होते. मात्र, सत्ताधा-यांनी त्यांना यशस्वी होऊ दिले नाही. सतत उत्तर महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली. जे मुख्यमंत्री पदाचे तेच विकासाचे. आम्हाला रोजगार उद्योग नको आहे का? मॅग्नेटीक महाराष्ट्रात हजारो कोटीची गुंतवणूक झाली. मात्र, उत्तर महाराष्ट्राला त्याचा काय लाभ?,'' असा प्रश्न ख़डसेंनी केला.

ते पुढे म्हणाले, ''शेतकरी, पाण्यासाठी आपण सतत संघर्ष केला. आपल्या हक्काचे पाणी कोणी पळवत असेल तर सर्वांनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून एकत्र येत संघर्ष केला पाहिजे. नार-पार व प्रसंगी कोकणातले पाणी एकडे आणले पाहिजे. आजवर आम्ही जे मिळविले ते कष्टाने मिळविले आहे. ३० हजार कोटीची कर्जमाफी करुनही शेतकरी सरकारचे कौतुक करत नाही. यातुन शेतक-यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत हा संदेश मिळतो. सरकारने लवकर जागे व्हावे.'' यावेळी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार, हेमलता पाटील आदींची भाषणे झाली. 

खडसेंनी नेतृत्व करावे 
शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी हवी ही शिवसेनेची भूमिका आहे. उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी, पाण्यासाठी खडसे यांनी नेतृत्व करावे. आम्ही त्यांना साथ देवू - दादा भुसे, ग्रामविकास राज्यमंत्री

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com