राज्याच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले : पृथ्वीराज चव्हाण कडाडले 

राज्याच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले : पृथ्वीराज चव्हाण कडाडले 

मुंबई : राज्यपालांचे अभिभाषण मराठीऐवजी गुजरातीत ऐकविल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे ही कमालीचे संतप्त झाले होते. सरकारचा हा गलथान कारभार आहे. सभागृहात संसदिय कार्यमंत्री गैरहजर आहेत. त्यांना याबाबत जबाबदार धरा. याची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करा. राज्याच्या इतिहासात अशी पहिल्यांदाच घटना घडली आहे. सरकारचा कारभार कसा भोंगळ चालला आहे याचे हे उदाहरण असल्याचा टोला त्यांनी लगावला. 

मराठी मुद्द्यावर सत्ताधारी व विरोधकांमध्ये विधानसभेत जोरदार घमासान झाले. मराठीचा आवमान झाल्याचा मुद्दा लावून धरत विरोधकांकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेचे गटनेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार प्रहार केले. त्यावेळी सत्ताधारी बाकावरून सरकारची बाजू अर्थमंत्री सुधीर मुनंगटीवार यांना लावून धरावी लागली. 

माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले, की हे विधानमंडळ विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींचे आहे. आजचा प्रकार हा सर्वांना कमीपणा आणणारा आहे. शिक्षणमंत्री तावडे यांनी अनुवाद करते वेळी अध्यक्ष सभापती यांची परवानगी घेतली होती का याचा खुलासा झाला पाहिजे. विधान मंडळाच्या हक्कावर अतिक्रमण करू शकत नाहीत, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी. 

यावर वळसे पाटील यांना थांबवत विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले, " असं त्यांनी काहीही केलेले नाही. कुणाच्याही हक्कावर मंत्र्यांनी गदा आणलेली नाही. " 

झाल्याप्रकाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीने माफी मागितली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभेचे गटनेते जयंत पाटील म्हणाले, " मराठी भाषेचा खून करायचा अन्‌ विधानसभेत येवून माफी मागायची हे योग्य नाही. मराठी भाषेचा आज अपमान झाला आहे. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांच्याकडून राजीनाम्याची अपेक्षा होती मात्र ते व त्यांचे शिवसेनेतील सहकारी काहीच न करता गप्प बसून राहिले. किमान राजीनाम्याची धमकी तरी द्यायला हवी होती. 

जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर मुंनगंटीवार यांनी जोरदार अक्षेप घेतला. मोठ्या आवाजातच मुनंगटीवर गर्जले," जयंतराव ज्ञानेश्वरांच्या मराठीचा उल्लेख तुम्ही खून झाला असा कसा करू शकता. तुम्हाला कळायला हवं. तुम्हीच मराठीच अवमान करत आहात. जयंतरावांचे वक्तव्य पटलावरून काढून टाकण्यात यावे. " 

यानंतर जयंत पाटील यांचे वक्तव्य पटलावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते अजित पवार मुख्यमंत्र्यांना डिवचताना म्हणाले, " सुधीरभाऊनी आक्षेप घेतल्यावर ते ओरडून बोलत होते. त्यांच्या घसा बसला असता. त्यांचा आवाज दाबला गेला असता. यावेळी मुख्यमंत्री महोदय तुम्ही हस्तक्षेप करायला हवा होता. मुख्यमंत्री महोदय तुम्ही एका एकाचे काटे काडाय लागलाय. मुख्यमंत्री महोदय तुम्ही सुधीरभाऊंना थांबवायला हवे होते. तुम्हाला ते नकोयत का ? असा चिमटा अजित पवार यांनी काढला. त्यामुळे विधानसभेत एकच हशा पिकली. 

या प्रकरणी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची घोषणा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केल्याने शोक प्रस्तावाला सुरवात करण्यात आली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com