मराठवाड्यातील शेतकरी सावकारांच्या दावणीला ? 

मराठवाड्यातील शेतकरी सावकारांच्या दावणीला ? 

मुंबई : शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीबाबत संभ्रम सुरू असतानाच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांमध्ये यंदाच्या खरीप पीक कर्जवाटपाची गती प्रचंड मंदावली असल्याचे माहिती पुढे आले आहे. मराठवाड्यात पीक कर्ज वाटपाचा "दुष्काळ" जाणवत आहे. यामुळे मराठवाडातील शेतकरी खासगी सावकाराच्या दावणीला गेल्याने राजकीय " फड" पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. 

या चारही जिल्ह्यांसाठी यंदाच्या खरीप हंगामाकरीता 4643 कोटी 76 लाख 39 हजार रूपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात 27 जुन अखेरपर्यंत या चारही जिल्ह्यात केवळ 1 लाख 54 हजार 279 शेतकऱ्यांना केवळ 659 कोटी 82 लाख 39 हजार रूपयांचेच कर्जवाटप केले गेले. गतवर्षी 27 जुनअखेरपर्यंत चारही जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखांसह, ग्रामीण व व्यापारी बॅंकांच्या शाखांनी 1658 कोटी 33 लाख 20 हजार रूपयांचे कर्ज वाटप केले होते.

 गतवर्षी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने 27 जुनपर्यंत 265 कोटी 50 लाख 54 हजार रूपयाचे कर्जवाटप केले होते. यंदा मात्र 61 हजार 284 शेतकऱ्यांना 161 कोटी 32 लाख 33 हजाराचे कर्ज वाटप केले. 

जालना जिल्हा बॅंकेने 27 जुन 2016 अखेरपर्यंत 97 कोटी 44 लाखाचे केलेले कर्जवाटप यंदा 43 कोटी 10 लाख 81 हजारावर अडकले आहे. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने गतवर्षी याच तारखेअखेर 158 कोटी 64 लाख 70 हजारापर्यंत केलेले कर्जवाटप यंदा 51 कोटी 73 लाख 80 हजारापर्यंतच पोहचू शकले.

 दुसरीकडे हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने गतवर्षी 27 जुन अखेरपर्यंत 62 कोटी 9 लाख 40 हजाराचे कर्जवाटप केले असताना यंदा मात्र या बॅंकेने केवळ 27 कोटी 52 लाख 50 हजार रूपयांचेच कर्जवाटप केले आहे. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकाबरोबरच व्यापारी बॅंकाही कर्जवाटपात पिछाडीवर आहेत. औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील व्यापारी बॅंकांच्या शाखांनी यंदा खरीपासाठी 3208 कोटी 29 लाख 79 हजार रूपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट मिळाले होते. 27 जुन अखेरपर्यंत चारही जिल्ह्यातील व्यापारी बॅंकांच्या शाखांनी केवळ 323 कोटी 97 लाख 96 हजार रूपयांचे कर्जवाटप करून केवळ 10.10 टक्‍केच उद्दिष्ट्यपुर्ती केली आहे. गतवर्षी व्यापारी बॅंकांनी 27 जुन अखेपर्यंत 921 कोटी 5 लाख 28 हजाराचे कर्जवाटप केले होते. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व व्यापारी बॅंकांच्या तुलनेत चारही जिल्ह्यातील ग्रामीण बॅंकांच्या शाखा कर्जवाटपात कमालीच्या पिछाडीवर आहेत. यंदा खरीपासाठी औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली या चारही जिल्ह्यातील ग्रामीण बॅंकांच्या शाखांना 558 कोटी 57 लाख 72 हजार रूपयांचे उद्दिष्ट्‌ देण्यात आले आहे. 

27 जुन अखेरपर्यंत त्यापैकी केवळ 52 कोटी 14 लाख 99 हजार रूपयांचे कर्जवाटप करून ग्रामीण बॅंक शाखांनी केवळ 9.34 टक्‍केच उद्दिष्ट्यपुर्ती केली आहे. गतवर्षी याच तारखेअखेर ग्रामीण बॅंकेने 153 कोटी 59 लाख 28 हजाराचे कर्जवाटप केले होते. 

सरकारच्या या कारभाराविरूध्द शेतकरी संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात असून शेतकऱ्यांना सुलभ पीक कर्ज मिळण्याची मागणीने जोर पकडला आहे. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. परंतु सरकारने कर्ज वितरण लवकर सुरु नाही केले तर शेतकऱ्याला सावरकरी पाशात गेल्या शिवाय ईलाज नाही. 
याची नोंद घेऊन मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना परभणी जिल्हा अध्यक्ष माणिक कदम यांनी केली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com