भगवानगडाचे इतर ट्रस्टी गेले कुठे - मृत्युंजय गर्जे

गडावर यापूर्वी छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकर येऊन गेले. म्हणजेच सर्व पक्ष, सर्व धर्माच्या लोकांचे गड हे श्रद्धास्थान असल्याने असा भेदभाव महंतांनी करू नये. आता गडावर मेळावा होण्यासाठी लोकांचीच इच्छा आहे, त्यामुळे काहीही झाले, तरी मेळावा गडावरच होणार आहे - मृत्युंजय गर्जे
भगवानगडाचे इतर ट्रस्टी गेले कुठे - मृत्युंजय गर्जे

नगर : ''भगवान गडावर दसरा मेळावा होऊ नये, असे फक्त महंत डाॅ. नामदेवशास्त्री महाराज बोलतात. इतर ट्रस्टी गेले कुठे. इतर ट्रस्टी कोण आहेत, हे लोकांना माहिती नाहीत. महंतांनी एकदा तरी ट्रस्टी मिटिंग लाईव्ह दाखवावी,'' असे आव्हान पाथर्डीचे नगराध्यक्ष मृत्यूंजय गर्जे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना गडाच्या महंतांना दिले आहे.

पाथर्डी तालुका ही देवांची भूमी आहे. मोहटागड, वृद्धेश्वर, भगवानगड मोठी देवस्थाने तालुक्यात आहे. पावसाचे प्रमाण कमी असले, तरी तालुक्यात पर्यटनामुळे विकास होत आहे. सर्व धर्म गुण्यागोविंदाने राहत असताना भगवान गडाचा वाद सुरू झाल्याने तालुक्याचे नाव राज्यभर गाजू लागले आहे. वाद होऊन भाविक व पर्यटनावर त्याचा परिणाम होणार आहे. गडावरील वाद होऊ नये, अशी सर्वसामान्य भाविकांची इच्छा आहे. याबाबत गर्जे यांच्याशी चर्चेतून अनेक मुद्दे समोर आले तसेच समाजातील अंतर्गत वाद पुढे आला.

समाजाची भूमिका विषद करताना गर्जे म्हणाले, ''देवस्थानाजवळ राजकीय लोकांनी येऊ नये, किंवा भाषणे करू नये, असे कसे होऊ शकते? प्रत्येक मोठ्या एकादशीला पंढरीच्या पांडुरंगाची पूजा तर मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते होत असते. राज्याच्या कल्याणासाठी, देशासाठी ते बोलतात, म्हणजे हे राजकीय होऊ शकत नाही काय. कै. गोपिनाथ मुंडे यांनी भगवान गडावर प्रत्येकवर्षी समाजाला मार्गदर्शन केले. राजकीय विषय हाताळले नाहीत. पण राजकीय व्यक्तीच्या प्रत्येक शब्दाला राजकीय अर्थ लावला जातो. ते साहजिकच आहे. गडाला राजाश्रय देण्यासाठी मुंडे यांनी केलेले प्रयत्न गडाचे प्रशासन विसरतेच कसे. सध्याचे गडाचे वैभव हे मुंडे यांच्याच प्रयत्नाचे फळ आहे. ते हयात असताना त्यांची मुलगी पंकजा मुंडे याही त्यांच्यासोबत येत होत्या. त्यावेळी महंत गप्प का होते. मुंडे गेल्यानंतरच महंतांना असे का सुचले. त्यांच्यामागे बोलविता धनी कोण आहे, हे पाहणे आवश्यक आहे,''

ते पुढे म्हणाले, ''गडावर यापूर्वी छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकर येऊन गेले. म्हणजेच सर्व पक्ष, सर्व धर्माच्या लोकांचे गड हे श्रद्धास्थान असल्याने असा भेदभाव महंतांनी करू नये. आता गडावर मेळावा होण्यासाठी लोकांचीच इच्छा आहे, त्यामुळे काहीही झाले, तरी मेळावा गडावरच होणार आहे.''

गर्जे पुढे म्हणाले, ''धार्मिक स्थळाचे विश्वस्त हे भाविकांमधून निवडले जातात. सध्या गडाचे विश्वस्त कोण आहेत, हे कुणीही सांगावे. समाजात कोणालाही हे सांगता येणार नाही. इतर विश्वस्त का नाही विरोध करीत. फक्त महंतच का बोलतात. विश्वस्त मंडळांची मिटिंग महंतांनी एकदातरी लाईव्ह दाखवावी. म्हणजे लोकांनाही कळेल, विश्वस्त कोण आहेत. काय करीत आहेत. गडावर मेळावा होण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत. याबाबत आम्ही तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत.''

भगवानगडासंबंधीच्या अन्य बातम्या :

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com