मनरेगा योजना राबवण्यात  महाराष्ट्राची पीछेहाट 

"मनरेगा' राज्यात जवळपास ठप्प आहे. सध्या "जलयुक्त शिवार' योजनेनुसार जलसंधारणाची कामे केली जात आहेत. त्यामुळे "मनरेगा'ला पुनरुज्जीवन देण्यासाठी या योजनेनुसार नव्या शाळा व महाविद्यालयांच्या भिंती बांधण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे.
manorega
manorega

मुंबई: रोजगार हमी योजना ही महाराष्ट्राने देशाला दिलेली देणगी आहे.  मात्र दिव्याखाली अंधार या म्हणीनुसार  "मनरेगा' योजना राबवण्यात महाराष्ट्रच आता  पिछाडीवर  गेला आहे. 

 राज्यात 2015-16 मध्ये 28 हजार 632  गावांपैकी पैकी नऊ हजार 22 गावांत "मनरेगा' योजना राबवण्यात आलेली नाही. राज्यातील 21 जिल्हे दुष्काळग्रस्त असून, तेथील 6 हजार 352 गावांत मनरेगा योजनेंतर्गत एकही काम करण्यात आलेले नाही. 

पुणे जिल्ह्यात एक हजार 407 गावे आहेत. तेथील 954 गावांत या योजनेतून एकही काम करण्यात आलेले नाही. "मनरेगा' ही केवळ रोजगार देण्याची योजना नसून, ती दुष्काळनिवारणासाठी आहे. एकीकडे सरकार जलयुक्त शिवार योजनेकडे विशेष लक्ष देत असताना या योजनेसाठी निधी देत नसल्याने राज्यात "मनरेगा'चा बोजवारा उडाला आहे.

 गेल्या वर्षी सप्टेंबरच्या शेवटी मॉन्सून संपला. त्या वेळीच देशातील 40 टक्के भागांत दुष्काळ निर्माण होणार असल्याचे लक्षात आले होते. तरीही त्यानंतर सहा महिने सरकारने दुर्लक्ष केले आहे. 
राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत सध्या दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहे. काही ठिकाणी टॅंकर मागवण्यास सुरवात झाली आहे. 

मराठवाडा हा दुष्काळी भाग असूनही तिथे अधिक पाणी लागणारे उसाचे पीक घेतले जाते. वर्षातील काही काळ साखर आणि मद्य कारखाने बंद ठेवण्याची गरज आहे. उसाचे उत्पादन राज्याच्या राजकारणाशी निगडित असल्याने ते बंद करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवली जात नाही. दुष्काळनिवारणासाठी सरकारने पाण्याविषयी नियम तयार केले पाहिजेत; पण त्यातही टाळाटाळ केली जात आहे. 

भिंती बांधण्याचा प्रस्ताव 


"मनरेगा' राज्यात जवळपास ठप्प आहे. सध्या "जलयुक्त शिवार' योजनेनुसार जलसंधारणाची कामे केली जात आहेत. त्यामुळे "मनरेगा'ला पुनरुज्जीवन देण्यासाठी या योजनेनुसार नव्या शाळा व महाविद्यालयांच्या भिंती बांधण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. 

सध्या राजस्थानात असा प्रयोग केला जात आहे. "मनरेगा'नुसार शाळा-महाविद्यालयांची दुरुस्ती; तसेच नव्या बांधकामांच्या कामासाठी नोंदणी असलेल्या मजुरांचा वापर केला जात आहे. त्यामुळे राज्याने सुरवात केलेल्या मनरेगा योजनेनुसार शाळा-महाविद्यालये उभारण्याच्या कामाला सरकारने मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com