आम्ही कमरेत लाथा घातल्या म्हणूनच 'त्यांनी' कर्जमाफी दिली - संजय राऊत

शेतकऱ्यांसह जनहिताच्या इतर महत्त्वाच्या प्रश्‍नांवर शिवसेना आंदोलन करते. या प्रश्‍नांची अडचण होत असल्याचे भाजपने सांगावे. तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर रान उठवल्याने आमची अडचण होतेय, सरकारमधून बाहेर पडा, आमचे आम्ही पाहून घेऊ, असे भाजपने स्पष्ट केल्यास सत्तेतून शिवसेना बाहेर पडेल.- संजय राऊत
आम्ही कमरेत लाथा घातल्या म्हणूनच 'त्यांनी' कर्जमाफी दिली - संजय राऊत

धुळे - ''जनहित, शेतकऱ्यांचे प्रश्‍न आंदोलनातून मांडणाऱ्या शिवसेनेची सत्तेत अडचण होत आहे, असे भाजपने सांगावे. 'तुम्ही (शिवसेना) सरकारमधून बाहेर पडा, आमचे काय ते आम्ही पाहून घेऊ,' हेही त्यांनी स्पष्ट करावे. शिवसेना लागलीच सत्तेतून बाहेर पडेल. आम्हीच स्वतःहून कशाला बाहेर पडायला पाहिजे,'' अशी भूमिका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी 'सरकारनामा'शी बोलताना मांडली.

शिवसंपर्क अभियानासाठी खासदार राऊत दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत शहरातील शाहू नाट्यमंदिरात सकाळी साडेअकराला पक्षाचा मेळावा झाला. त्यात पुढील मुख्यमंत्री हा शिवसेनेचा राहील आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतील, असे मी जाहीर करत असल्याचे खासदार राऊत म्हणाले. तसेच शिवसेना जुलैमध्ये राजकीय भूकंप केल्याशिवाय राहणार नाही. भूकंपाची भाषा केल्याबरोबर तडे मंत्रालय व वर्षा बंगल्यापर्यंत पोहोचल्यामुळे कर्जमुक्तीची घोषणा झाल्याचे ते म्हणाले.

भाजपने सांगितले तरच सत्तेबाहेर
मेळाव्यापूर्वी शिवआरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. माधुरी विपुल बाफना- बोरसे यांच्या निवासस्थानी खासदार राऊत यांनी निरनिराळ्या प्रश्‍नांवर 'सरकारनामा'शी दिलखुलास संवाद साधला. शिवसेना व भाजपमध्ये सख्य उरले नसल्याने राज्यात मध्यावधी निवडणूक केव्हाही लागू शकते. या अनुषंगाने शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, भाजप शिवसेनेची साथ सोडेल, अशी उलटसुलट चर्चाही होते. यात नेमके काय घडेल?, अशा प्रश्‍नावर खासदार राऊत म्हणाले, ''राज्यात केव्हा काहीही घडू शकते. काही तरी बऱ्यापैकी घडावे, अशी शिवसेनेला अपेक्षा आहे. स्व-आमदारांचे संख्याबळ अधिक असल्याने भाजपने पाठिंबा काढून घेण्याचा प्रश्‍नच येत नाही. सरकारमध्ये राहूनही सरकारला विरोध करतात, जनहितासह शेतकऱ्यांचे प्रश्‍न आंदोलनातून मांडतात, विरोधी पक्षाचे काम करतात, मग सत्तेतून बाहेर का पडत नाहीत, अशी विचारणा शिवसेनेला होते. मुख्यमंत्रीपदामुळे भाजपच्या सरकारकडे शिवसेनेचे मंत्री वाढवा, शिवसेनेच्या विद्यमान मंत्र्यांचे अधिकार वाढवा, गृहमंत्रिपद द्या, अशी मागणी शिवसेना कधीही करत नाही. तशी मागणी केलेली नाही. शेतकऱ्यांसह जनहिताच्या इतर महत्त्वाच्या प्रश्‍नांवर शिवसेना आंदोलन करते. या प्रश्‍नांची अडचण होत असल्याचे भाजपने सांगावे. तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर रान उठवल्याने आमची अडचण होतेय, सरकारमधून बाहेर पडा, आमचे आम्ही पाहून घेऊ, असे भाजपने स्पष्ट केल्यास सत्तेतून शिवसेना बाहेर पडेल.''

लाथा घातल्याने कर्जमुक्ती
''राज्यातील आगामी व पुढील सर्वच निवडणुका शिवसेना स्वबळावर लढेल. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात अस्तित्वच उरले नसल्याने शिवसेना आणि भाजपमध्ये लढाई असेल. शिवसेनेने तीव्र आंदोलन, नाशिकच्या कृषी अधिवेशनातून दबाव निर्माण केल्याने भाजप सरकारने 'तत्त्वतः' कर्जमाफी जाहीर तर केली. त्यात तत्त्वतः या शासकीय शब्दाचा नेमका अर्थ आम्ही शोधत आहोत. सरसकट कर्जमाफी जुलैअखेरपर्यंत प्रत्यक्षात उतरली नाही, तर शिवसेना अधिक तीव्र आंदोलन सुरू करेल. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य दिले, हमीभाव दिला, तर त्यांच्या आत्महत्या थांबविता येऊ शकतात. यासाठी सर्व काही झुगारून शिवसेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरली आहे. सरकारमध्ये राहून भाजप सरकारच्या कमरेत लाथा घालत राहिलो म्हणून कर्जमुक्ती झाली.'' असेही राऊत म्हणाले. शिवसेना सरकारमधून का बाहेर पडत नाही या प्रश्‍नावर कर्जमुक्ती हे उत्तर असल्याचे खासदार राऊत यांनी ठासून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com