कचरा येऊ देणार नाही असे शिरसाट कसे म्हणू शकतात- किशनचंद तनवाणी

 कचरा येऊ देणार नाही असे शिरसाट कसे म्हणू शकतात- किशनचंद तनवाणी

औरंगाबाद : पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय सिरसाट यांनी माझ्या मतदारसंघात कचरा आणू देणार नाही अशी भूमिका घेत जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता. यावर भाजपचे नगरसेवक राजू शिंदे यांनी रविवारी टीका केल्यानंतर आज भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी देखील शिरसाट यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. "कचरा येऊ देणार नाही, असे आमदार संजय सिरसाट कसे म्हणू शकता' असा सवाल करत त्यांनी या वादात उडी घेतली. 

एकोणीस दिवस उलटून गेले तरी शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सुटलेला नाही. उच्च न्यायालयाने देखील नारेगावांत कचरा टाकायचा नाही असे अंतरिम आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची कोंडी वाढली आहे. त्यात शिवसेना-भाजपमधील स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील वादाची भर पडली आहे. कचऱ्यामुळे शहरातील पंधरा लाख नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. 

नारेगावमध्ये कचरा टाकायचा नाही असे न्यायालयाचे आदेश आहेत, तर शहराच्या इतर भागात कचरा नेल्यास लोक हिंसक आंदोलनाचा पावित्रा घेतात. त्यामुळे कचरा प्रश्‍नावर सगळ्यांनीच हात टेकले आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी बैठका, चर्चा, भेटीगाठी, नागरिकांचा सहभाग, सूचना या सगळ्यांचा विचार करून झाला पण तोडगा निघालेला नाही. 

कचऱ्याचा प्रश्‍न सोडवण्याची जबाबदारी ज्या महापालिका प्रशासन, नगरसेवक, लोकप्रतिनिधींवर आहे, त्यांनीच या प्रश्‍नावरून राजकारण सुरू केल्याचे समोर आले आहे. कांचनवाडी, नक्षत्रवाडी या पश्‍चिम मतदारसंघात कचरा टाकण्याचा प्रयत्न झाला त्याला शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट यांनी विरोध केला. तत्पुर्वी पैठण तालुक्‍यातील बाभुळगाव येथे आमदार संदीपान भुमरे यांनी विरोध केला होता. यावरून आता भाजपने शिवसेनेवर नेम धरला आहे. 

मंगळवारी (ता. सहा) आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. आमदार शिरसाट पश्‍चिममध्ये कचरा येऊ देणार नाही, असे कसे काय म्हणू शकतात, असा सवाल करत तनवाणी यांनी शिवसेनेवर खापर फोडण्याचा प्रयत्न केला. 

त्याला शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी "आतापर्यंत कोणी काय केले यावर चर्चा न करता, मार्ग कसा काढता येईल, याकडे लक्ष द्या' असे सुनावले. माजी महापौर कला ओझा यांनी देखील तनवाणी यांची री ओढत "प्रत्येकाने मतदार संघाचा विचार केला तर प्रश्‍न कसा सुटेल? मग नारेगावकरांनी संपूर्ण शहराचा कचरा का म्हणून स्वीकारायचा असे म्हणत शिवसेनेला घरचा आहेर दिला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com