"एमआयएम' नको म्हणणाऱ्या कॉंग्रेसने राष्ट्रवादीची साथ सोडावी - इम्तियाज जलील

"एमआयएम' नको म्हणणाऱ्या कॉंग्रेसने राष्ट्रवादीची साथ सोडावी - इम्तियाज जलील

औरंगाबाद : दलित, मुस्लिमांसह बहुजनांची ताकद आणि त्या जोरावर आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा जिंकू याचा अंदाज कॉंग्रेसला आला आहे. तेव्हा एक आणि दोन जागाची भीक कॉंग्रेस कशासाठी देत आहे. एमआयएम नको हे पालुपद कॉंग्रेसने लावले आहे, तर मग ऍड. प्रकाश आंबेडकरांनीदेखील राष्ट्रवादीशी आघाडी करणार नाही अशी ठाम भूमिका यापूर्वी जाहीर केली होती, कॉंग्रेसने देखील राष्ट्रवादीची साथ सोडावी असा टोला एमआयएमचे आमदार व महाराष्ट्रातील नेते इम्तियाज जलील यांनी सरकारनामाशी बोलतांना लगावला. 

ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत आघाडी करण्यास कॉंग्रेस तयार आहे, परंतु एमआयएम शिवाय त्यांनी यावे या भूमिकेवर कॉंग्रेस अडून बसली आहे. या बदल्यात अकोल्यासह आणखी एक लोकसभेची जागा देण्याची तयारी कॉंग्रेसने दाखवल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर इम्तियाज जलील यांनी एमआयएमची भूमिका स्पष्ट केली. इम्तियाज जलील म्हणाले, ज्या प्रकाश आंबेडकरांना अकोल्यातून पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसने वारंवार प्रयत्न केले, तीच कॉंग्रेस आज अकोला मतदारसंघात त्यांना मदत करायला तयार झाली आहे. 

वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढली तर दलित, मुस्लिम आणि वंचितांच्या ताकदीवर आम्ही किती लोकसभेच्या जागा जिंकू शकतो याचा कॉंग्रेसने आधी विचार केला पाहिजे आणि मग किती जागा सोडणार हे सांगावे. एक दोन जागांची भीक देऊन दलित समाजाची सहानुभूती मिळवण्याचा कॉंग्रेसचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. प्रकाश आंबेडकरांबद्दल कॉंग्रेसला एवढेच प्रेम असेल तर त्यांनी अकोल्यातून त्यांना बिनविरोध निवडून आणावे असे आव्हान देखील इम्तियाज जलील यांनी कॉंग्रेसला दिले. 

बाळासाहेब आमची साथ सोडणार नाहीत
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एका ध्येयाने एकत्र आली आहे. समाजातील गरीब, वंचितांना सत्तेचा वाटा मिळावा, त्यांचे प्रश्‍न सुटावे या हेतून ही आघाडी उदयास आली आहे. एमआयएम नको अशी कॉंग्रेसने भूमिका घेतली तेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी देखील राष्ट्रवादीशी आम्ही युती करणार नाही. तुम्हाला राष्ट्रवादी हवी असेल तर त्यांना खुशाल सोबत घ्या. पण जिथे त्यांचे उमेदवार असती तिथे आमचा निर्णय वेगळा असेल असेही त्यांनी जाहीर केले होते. मग एमआयएम नको म्हणणारी कॉंग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडणार का? हा देखील प्रश्‍न आहे. वंचित आघाडीने कॉंग्रेस सोबत आघाडी करण्यासाठी महाराष्ट्रातील 12 लोकसभा जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यावर दोन जागा देण्याची तयारी त्यांनी दाखवल्याचे ऐकिवात आहे. ही खैरात कशासाठी? 

राहिला प्रश्‍न एमआयएमला सोडून कॉंग्रेस सोबत जाण्याचा, तर बाळासाहेब आंबेडकर आमची साथ सोडणार नाही याची आम्हाला शंभर नव्हे तर दोनशे टक्के खात्री असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. मुळात आघाडी बाबत प्रकाश आंबेडकरांशीच काय ? वंचित आघाडीच्या कोणत्याच नेत्याशी कॉंग्रेसची चर्चा सुरू नसल्याचा दावा पुन्हा त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com