जगताप-पाचपुतेंमध्ये रंगले वाक्‌युद्ध

जगताप-पाचपुतेंमध्ये रंगले वाक्‌युद्ध

नगर : "कुकडी'च्या पाण्यावरून श्रीगोंदे तालुक्‍यात जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आमदार राहुल जगताप यांनी थेट कालवा फोडणे, कालव्यात बसून भजन, कालव्यात मुक्काम, असे आंदोलन सुरू केले, त्याचा गवगवा झाला. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी त्यांच्यावर नकलाकार म्हणून टीका केली. त्याला प्रतिउत्तर म्हणून जगताप यांनी पाचपुते यांना चार्ली-चापलीन अशी टीका केली. हा रंगलेला कलगीतुरा राजकीय वर्तुळातून चर्चिला जात आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राहुल जगताप व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यातील राजकीय विरोध निवडणुकीच्या वेळेस कायम टिपेला पोचत होता. विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप यांनी पाचपुते यांचा केलेला दारुण पराभव, विविध ग्रामपंचायतींवर मिळविलेला कब्जा पाचपुते यांना सलत नसेल, तर नवलच.

साहजिकच अधुन-मधून अशा भाषणबाजीतून दोघेही तालुक्‍याचे लक्ष कायम वेधून घेत असतात. 
सध्या "कुकडी'चे पाणी श्रीगोंदेकरांना मिळावे, या मागणीसाठी आमदार राहुल जगताप यांनी आंदोलनात बाजी मारली. विधानसभेत शेतकरी प्रश्‍नावर निलंबित होऊन आधीच त्यांनी शेतकऱ्यांचे मने जिंकली होती. त्यात "कुकडी'च्या प्रश्‍नात शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आंदोलनाची केलेली सुरवात विशेष चर्चेचा ठरला आहे. 
पाचपुते यांचा सरकारला घरचा आहेर 
""शेतकरी उद्‌धवस्त होताना स्वस्थ कसा बसू. आमदार नसलो, तरी शेतकऱ्यांचे हाल उघड्या डोळ्यांनी पाहू का,'' असा प्रश्‍न करीत बबनराव पाचपुते यांनी आमदार राहुल जगताप यांच्यावर टीका केली. भाजपचे सरकार असताना शेतकऱ्यांचे हाल होताहेत, हे त्यांनी एक प्रकारे मान्य करून सरकारला घरचा आहेर दिला. पिके पाण्यावाचून जळाली असताना भाजपचे सरकार असताना पाचपुते यांनी का प्रयत्न केले नाहीत, असा प्रश्‍न ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. भाजपचे नेते म्हणून मिरविता, मग पाणी आणा, अशी हाक शेतकरी दित आहेत. 
दोघांकडूनही प्रसिद्धीचा स्टंट 
गॅस वेल्डींगने कालवा फोडण्याचा प्रयत्न करणे, कालव्यात बसून भजन करणे, अशी आंदोलने करून लोकांचे लक्ष वेधणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राहुल जगताप व "कुकडी'च्या प्रश्‍नासाठी सरकारमध्ये असूनही प्रयत्न न करता टीका-टीपन्नीमध्ये व्यस्त असलेले भाजपचे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केवळ प्रसिद्धीचा स्टंट सुरू केला आहे. दोघांनाही शेतकऱ्यांचे देणे-घेणे नाही, असा टीका आता कॉंग्रेस व इतर पक्षातील नेते करत आहेत. 
पालकमंत्री राम शिंदे नामानिराळे 
"कुकडी'च्या पाण्याचा लाभ श्रीगोंदे व कर्जत तालुक्‍याला होतो. पाणी सोडण्यासाठी सध्या श्रीगोंदेतील नेते पेटले आहेत. खरे तर जिल्ह्याचे पालकमंत्रीही याच मतदारसंघाला जवळचे. असे असताना पाचपुते-जगताप यांची भांडणे पाहून पालकमंत्री प्रा. राम शिंदे नामानिराळे राहिले आहेत. शेतमालाला चांगला भाव नाही, पाण्याअभावी उभी पिके जळू लागले असताना भाजपचे असलेले प्रा. शिंदे यांच्यावर शेतकऱ्यांचा रोख असायला हवा होता, मात्र दोघांच्या भांडणात ते नामानिराळे आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com