ज्येष्ठत्वानुसार मुख्यमंत्री मीच व्हायला हवा होतो - एकनाथ खडसेंची खदखद

'जिल्ह्यात वर्षानुवर्षांपासून मीच कार्यकर्ते घडविले आणि मोठे केले. त्यांना संधी दिली. माझ्या मनात श्रेयवादाची भावना कधी निर्माण झाली नाही आणि होणार नाही. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी युती केली असती तर निकालानंतर हा युतीचा विजय आहे असे म्हटले असते. मीच पक्षाला एकटे लढविण्यासाठी भाग पाडले आणि त्यामुळे भाजपचा विजय झाला. निवडणुकीत उभे असलेले सर्वच्या सर्व 75 उमेदवार नाथाभाऊंचे आहेत - एकनाथ खडसे
ज्येष्ठत्वानुसार मुख्यमंत्री मीच व्हायला हवा होतो - एकनाथ खडसेंची खदखद

भुसावळ : पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. शहरातील आयएमए हॉलमध्ये ईइएसएल व चार पालिकांशी एलईडी पथदिव्यांसाठी झालेल्या करारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

सर्वांचा नेता मीच
सोशल, प्रिंट आणि इलेक्‍ट्रॉनिक मीडियावर खडसे आणि महाजन गटामध्ये चुरस असल्याचे दाखविले जाते. आमच्यात असे कोणतेही गट-तट नाही आणि असले तर त्या सर्वांचा मीच नेता आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. जळगाव महापालिका निवडणुक निकालाच्या पार्श्‍वभूमीवर खडसे यांनी मनातील खदखद मोकळी केली आणि पक्षाला राज्यापासून जळगावला सत्तेत आणण्यासाठी आपले योगदान असून शिवसेना- भाजप युती आपणच तोडल्याचा त्यांनी पुर्नउच्चार केला. 

जळगावचे श्रेय एकाचे नाहीच
जळगाव महापालिका निकालाबाबत ते म्हणाले, ''मी चाळीस वर्षापासून भाजपचे काम करीत आहे. त्यातील तीस वर्षे जळगावला भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष केला. स्वत:ला श्रेय मिळावे म्हणून कधी लढा दिला नाही. अन्याय, भ्रष्टाचारावर प्रहार केले. कुणीतरी श्रेय घेण्यापेक्षा जनतेला सर्व काही माहित आहे. नाथाभाऊंबद्दल जनतेच्या मनात इतका आदर आहे की श्रेय दिले काय आणि नाही दिले काय काहीएक फरक पडत नाही. ज्याला श्रेय मिळत नाही त्यांना श्रेय द्या. जळगाव महापालिकेतील भाजपचा विजय हा सर्वांचा विजय आहे याचे श्रेय घेणाऱ्यांना शुभेच्छा." 

जळगावचे सर्व 75 उमेदवार नाथाभाऊंचे
खडसे म्हणाले, ''जिल्ह्यात वर्षानुवर्षांपासून मीच कार्यकर्ते घडविले आणि मोठे केले. त्यांना संधी दिली. माझ्या मनात श्रेयवादाची भावना कधी निर्माण झाली नाही आणि होणार नाही. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी युती केली असती तर निकालानंतर हा युतीचा विजय आहे असे म्हटले असते. मीच पक्षाला एकटे लढविण्यासाठी भाग पाडले आणि त्यामुळे भाजपचा विजय झाला. निवडणुकीत उभे असलेले सर्वच्या सर्व 75 उमेदवार नाथाभाऊंचे आहेत," 

''नाथाभाऊ, नाथाभाऊ आहे. पक्षात कुठलीही घुसमट नाही. कोणी सोबत नसताना मी एकट्याने जळगावला जागा लढविल्या होत्या. प्रतिकुल परिस्थितीत मी एकट्याने डॉ.के.डी. पाटील यांना लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आणले, त्यानंतर विरोधात असताना 34 नगरसेवक निवडून आणले ते एकट्याच्या बळावर." असेही ते म्हणाले.

मीच तोडली युती 
''माझ्या आवाजाची क्लिप महापालिका निवडणुकीत व्हायरल केली म्हणजेच माझी गरज आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही महाराष्ट्रात मीच भाजप-शिवसेनेची युती तोडली म्हणून भाजपला यश मिळाले. गिरीश महाजन काय नि नाथाभाऊ काय, पक्षात ज्येष्ठत्व नाकारले जात नाही, हेच शेवटी खरे आहे.'' असेही प्रतिपादन खडसे यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com