आरक्षण देऊ शकत नसाल तर मराठ्यांकडे मत मागायला येऊ नका - हर्षवर्धन जाधव

आरक्षण देऊ शकत नसाल तर मराठ्यांकडे मत मागायला येऊ नका - हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी सगळा समाज रस्त्यावर उतरला आहे, तरुण बलिदान देत असतांनाही सत्ताधाऱ्यांकडून धूळफेक करण्याचे काम सुरू आहे. सरळ विधानसभेत विधेयक आणून ते मंजुर करा, पुढे लोकसभेत मांडा, पंतप्रधान मोदी, राहूल गांधी आमच्या पक्षाचे नेते उध्दव ठाकरे यांनी एकत्रितपणे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा. आणि जर तुम्ही आरक्षण देऊ शकत नसाल तर मराठ्यांकडे मत मागायला येऊ नका अशी भूमिका आमदारकीचा नुकताच राजीनामा दिलेले शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव यांनी मांडली. 

मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा यासह इतर मागण्यांसाठी हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. अध्यादेश नाही काढला तर आमदारकीचा राजीनामा देईन असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानूसार डेडलाईन संपताच जाधव यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. त्यानंतर आज (ता. 27) हर्षवर्धन जाधव यांनी आपले ठिय्या आंदोलन क्रांतीचौक येथील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात विलिन केले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना हर्षवर्धन जाधव म्हणाले, लोकांसाठी वेळोवेळी कायदे बदलून घेतले पाहिजे, कारण लोकशाही आहे, ठोकशाही किंवा अधिकारशाही नाही. त्यामुळे लोकांना जे पाहिजे ते जर तुम्ही देऊ शकत नसाल तर लोकशाही झक मारायला आहे का? 

संविधान, राज्यशास्त्राचा अभ्यास करा 
राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या, युपीएससी, एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना माझे आव्हान आहे. तुम्ही राज्यशास्त्र, संविधानाची पुस्तके आणून वाचा. त्यात कायदे कशासाठी आहेत, ते बनवण्याचा अधिकार कुणाला आहे? या देशात कोर्ट, न्यायाधीश मोठे आहेत का भारतीय नागरीक हे तुम्हाला लक्षात येईल. 
त्यामुळे भूमिकेवर ठाम राहा, आत्महत्या किंवा आत्मदहना सारखे प्रकार करू नका. कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे वागू नका. राजकीय गुन्ह्यांना तर अजिबात घाबरू नका, ते मागे घेतले जातात, नाही तर आपण घ्यायला लावू. पोलीस राजकीय दबावाखाली काम करतात. पोलीसांचा सगळ्यात मोठा बळी मी आहे. मला मारहाण करून उलट माझ्यावरच 307 चा गुन्हा दाखल केला होता याची आठवण देखील हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी करून दिली. 
पन्नास आमदार राजीनामे देणार 
आता कुठल्या न कुठल्या मार्गाने पाच आमदारांचे राजीनामे आले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी पन्नास आमदारांचे राजीनामे येतील तेव्हा मुख्यमंत्र्यांवर डोक्‍याला हात मारून घेण्याची वेळ येईल. भाजपच्या आमदारांनी देखील राजीनामा देणे सुरू केलंय. उद्या सगळी विधानसभा मोकळी होईल आणि हे एकटेच राहतील असा टोला लगावतानाच हिंमत सोडू नका असे आवाहन हर्षवर्धन जाधव यांनी आंदोलकांना केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com