दूध उत्पादकांसाठीची घोषणा फसवी, सरकारला सळो की पळो करून सोडणार- रविकांत तुपकर 

दूध उत्पादकांच्या प्रश्‍नावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडून निर्यात होणाऱ्या दुधावर प्रतिलिटर पाच रुपये तर भुकटीसाठी पन्नास रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र स्वाभिमानी संघटना या निर्णयावर समाधानी नाही.
Ravikant Tukpar
Ravikant Tukpar

औरंगाबाद : "राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना निर्यातीसाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. प्रत्यक्षात निर्यात होणाऱ्या दुधाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. शेतकऱ्यांना याचा काहीच फायदा होणार नाही. सरकारची ही घोषणा फसवी आहे,'' असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना केला. स्वाभिमानी आपल्या आंदोलनावर ठाम असून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत या सरकारला सळो की पळो करून सोडू, प्रसंगी कायदा हातात घेऊ असा इशारा देखील त्यांनी दिला. 

दूध उत्पादकांच्या प्रश्‍नावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारकडून निर्यात होणाऱ्या दुधावर प्रतिलिटर पाच रुपये तर भुकटीसाठी पन्नास रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र स्वाभिमानी संघटना या निर्णयावर समाधानी नाही. या संदर्भात रविकांत तुपकर यांनी पत्रकारांशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली. तुपकर म्हणाले, ''टेट्रापॅकमधून निर्यात केल्या जाणाऱ्या दुधाचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे निर्यात केल्या जाणाऱ्या दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये व भूकटीसाठी 50 रुपयांचे अनुदान देण्याच्या घोषणेचा काडीमात्र लाभ शेतकरी किंवा दुध उत्पादकांना होणार नाही, तो फक्त दुध संघाना होईल.'' 

''मे महिन्यात सरकारने 3 रुपये प्रमाणे भुकटीच्या अनुदानावर 53 कोटी रुपये खर्च केले. एवढे करूनही शेतकऱ्यांच्या दुधाचे दर लिटरमागे दोन रुपयांनी पडले. त्यामुळे या पैशाचा चुराडा सरकारने केला आणि त्याचा फायदा दुध संघांनी लाटला. त्यामुळे काल घेतलेला निणर्य म्हणजे सरकारी तिजोरीवर सामुहिकपणे टाकलेला दरोडा आहे. दुध संघ आणि मुठभर लोकांना फायदा मिळवून देण्यासाठी तो घेण्यात आला आहे,'' असाही आरोप तुपकर यांनी केला.

दूध संघांच्या मध्यस्थीची गरज नाही
तुपकर पुढे म्हणाले, "आमची मागणी सरकारकडे अशी आहे की जे अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे ते काही महिने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. कर्नाटक, गुजरात, केरळसह इतर राज्यात अशा पध्दतीने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. आम्हाला दूध संघाच्या मध्यस्तीची गरज नाही. हा निर्णय होत नाही तोपर्यंत स्वाभिमानीचे आंदोलन थांबणार नाही. 

''16 तारखेपासून आम्ही अधिक आक्रमकपणे आंदोलन करणार आहोत. आम्ही ठाम आहोत, राज्यातील दुध उत्पादक सरकारला सळो की पळो करून सोडल्या शिवाय राहणार नाही. सरकारने दबावाची भाषा केली तर आम्ही कायदा हातात घेऊ. पण शेतकऱ्यांना, दुध उत्पादकांना न्याय दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही हा आमचा निर्धार आहे," असा इशारा देखील रविकांत तुपकर यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com