साहेब आज हयात नाहीत पण त्यांच्या समाधीवर लोक लग्न पत्रिका ठेवतात :  पंकजा मुंडे

देवेंद्र फडणवीसजी पुढच्या वर्षीही मुंडेंच्या पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर आपणच मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहावे अशी माझी सदिच्छा आहे. -पंकजा मुंडे
Pankajatai-&-Gopinathrao
Pankajatai-&-Gopinathrao

बीड :  " गोपीनाथ गड हा गोरगरिबांचा, वंचितांचा आशेचा आणि प्रेरणेचा गड आहे. मी जेव्हा केव्हा दर्शनाला येते, तेव्हा समाधीवर एखादी लग्नपत्रिका असतेच. त्यावर लग्नाचे आमंत्रण असते, आदरणीय साहेब ! जो माणूस आज हयात नाही त्याला हे पत्रिका देतात. म्हणजे लोक गोपीनाथरावांना दैवत मानतात,'' अशी भावपूर्ण आठवण राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितली.

त्या म्हणाल्या, " घरात लग्नकार्ये ठरले तर दैवताला, घरातील ज्येष्ठ माणसाला जशी पहिली पत्रिका दिली जाते तशी पत्रिका समाधीवर अर्पण करतात. नवविवाहित आशीर्वाद घेण्यासाठी येतात. लेकरू झाले तर दर्शनासाठी घेऊन येतात. या गडापासून गरिबांना ऊर्जा मिळते.''

कै. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

त्या पुढे म्हणाल्या, " खरे म्हणजे आजचा दिवस आमच्यासाठी कायम लक्षात राहणारा आहे. या दिवशी आमच्या कुटुंबावर आघात झाला. साहेब निघून गेले. या दुःखात घरी रडत-कुढत बसण्यापेक्षागोपीनाथ मुंडे यांची मुलगी म्हणून लढण्याचे मी ठरवले. तुम्ही सर्वांनी बळ दिले. मी तुमची मोठी कर्जदार आहे. मी तुमच्या ऋणात आहे. तुमचा विश्‍वास मिळविल्याशिवाय आणि विकास केल्याशिवाय मी थांबणार नाही. काही लोक म्हणतात की तुम्ही मुंडेसाहेबांचे नाव का लावता ? मी मुंडेसाहेबांचे नाव जगाला विसरू द्यायचे नाही असा मी निर्धार केला आहे. त्यासाठी गोपीनाथरावांचा विचार पुढे नेणाऱ्या खासदार-आमदारांना मी बळ देत आले आहे."

" देवेंद्र फडणवीसजी पुढच्या वर्षीही मुंडेंच्या पुण्यतिथीला गोपीनाथ गडावर आपणच मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहावे अशी माझी सदिच्छा आहे,'' असे सांगून पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व समाज घटकांना बरोबर घेण्याची भूमिका घेतली. जातीचे राजकारण करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी चोख उत्तर दिले आहे. काही जणांनी मुख्यमंत्र्यांचा जातिवाचक उल्लेख केला. तेव्हा मला संताप अनावर झाला होता. पण याच मुख्यमंत्र्यांनी मराठा व धनगर समाजाचे प्रश्‍न मार्गी लावले आहेत. त्यामुळे येत्या 3 जूनलाही आपणच गडावर मुख्यमंत्री म्हणून यावे. फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी माझे शंभर टक्के योगदान राहील.''


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com