गोपीनाथजींच्या प्रेमाखातर देत गेलो आणि बीड जिल्हाच रिकामा झाला : उद्धव ठाकरे

गोपीनाथजींच्या प्रेमाखातर देत गेलो आणि बीड जिल्हाच रिकामा झाला : उद्धव ठाकरे

बीड : प्रमोद महाजनांना बाळासाहेबांनी " हिंदू एकवटू शकतो' असे सांगितले होते. महाजनांनी ते त्यांनी करून दाखवले. गोपीनाथ मुंडेंचे आणि आमचे संबंध दीर्घकाळाचे होते, त्यात ओलावा होता, ऋणानुबंध होता, गोपीनाथजींसाठी आम्ही काहीही करायला तयार होतो, त्यांच्या प्रेमासाठी, त्यांच्या शब्दासाठी आम्ही बीड जिल्ह्यातील एक एक जागा देत गेलो, त्यांनी मागितलेल्या जागा त्यांना आम्ही दिल्या, आणि जिल्हा मोकळा झाला, केवळ एक जागा राहिली. मात्र आता पुन्हा बीड जिल्ह्यात शिवसेना बळकट करायची आहे. मला संपूर्ण जिल्हा भगवा पाहायचा आहे. जिल्ह्यातील लोकसभा आणि सहाही विधानसभा शिवसेनेच्याच झाल्या पाहिजेत असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. 

श्री. ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी बूथ आणि शाखा प्रमुखांचा मेळावा झाला. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी परिसरातील दुष्काळी पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, मात्र हे केवळ मी म्हणतो म्हणून होणार नाही, तर यासाठी सर्वांनी कामाला लागा. घराघरात जाऊन सरकारच्या घोषणांचे वास्तव मांडा, कर्जमाफी खरेच झाली का ? उज्वला योजनेतून कोणाला लाभ मिळाला ? घरे किती लोकांना मिळाली याचा पंचनामा करा, त्याची माहिती गावागावात लावा, इतके केले तरी खूप झाले, एकदा लोकांना वास्तव कळू द्या मग आपल्याला प्रचार करण्याची देखील गरज पडणार नाही असेही ठाकरे म्हणाले. 

आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रयत्न केले म्हणून देशात हिंदुत्वाचा विचार मानणारे शक्तिमान सरकार बसले आहे. मात्र, मागच्या साडेचार वर्षात या सरकारने हिंदू समाजाचा भ्रमनिरास आणि सामान्यांची फसवणूक केली. म्हणूनच यांच्या पापात सेना भागीदार होणार नाही, हिंदुत्वाचा, राममंदिराचा मुद्दा घेऊन आम्ही चालणार आहोत. 
मेळाव्याला मंत्री अर्जुन खोतकर , शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर , खासदार चंद्रकांत खैरे, आमदार मनीषा कायंदे , गोविंद घोळवे , जिल्हा प्रमुख सचिन मुळूक , कुंडलिक खांडे, विलास शिंदे , सुनील धांडे, अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे उपस्थिती होते. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी उपजिल्हा प्रमुख संजय महाद्वार , बाळासाहेब अंबुरे आदींनी पुढाकार घेतला. 

माझे हिंदुत्व निवडणुकीचे मग राहुल गांधींचे काय ? 
मी राम मंदिर अथवा हिंदुत्वाचा मुद्दा घेतला तर ते हिंदुत्व निवडणुकीपुरते असल्याचे कॉंग्रेस म्हणते, मग तुमचे राहुल गांधी प्रत्येक मंदिरात जात आहेत ते काय आहे असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com