शिवसेना -भाजपमध्ये गणेशोत्सवाच्या परवानगीवरून नवा वाद शक्‍य

 शिवसेना -भाजपमध्ये गणेशोत्सवाच्या परवानगीवरून नवा वाद शक्‍य

मुंबई : सायलेन्स झोनमुळे मुंबईतील हजारो गणेशोत्सव मंडळाच्या परवानग्या पोलिसांकडून नाकारण्यात येणार असल्याने शिवसेनेने या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टाकला असला तरी , याप्रकरणाचे श्रेय शिवसेनेला मिळू नये याची काळजी भाजपने घेतली असल्याचे दिसून आले आहे. त्यातून सेना भाजपमध्ये नवा श्रेयवाद निर्माण करण्याची शक्‍यता आहे. 

मुंबईत सायलेन्स झोन मध्ये असलेल्या गणेशोत्सव मंडळांना यंदा परवानगी न देण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला असल्याचे समजताच शिवसेनेने यावर तोडगा काढावा असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले, अशी माहितीही शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी दिली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही गणेशोत्सवाबाबत शांतता क्षेत्र व दहिहंडीच्या अडचणींवर कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे सांगितले आहे. 

मुंबईतील सायलेन्स झोनमुळे गणेशोत्सव मंडळामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे शेलार यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेऊन यासंदर्भात पत्र लिहून तातडीने बैठक घेण्याची विनंती केली. त्यानुसार याच आठवडाभरात ही बैठक होईल असे मुख्यमंत्र्यांनी यावर सांगितले आहे. दरम्यान मुंबईतील गणेशोत्सवाबाबत मुंबई महापालिका, पोलीस प्रशासन यांच्यात नुकतीच बैठक झाली. या बैठकीला आपण स्वतः हजर होतो, त्यावेळी सायलेन्स झोनबाबत मुंबईत स्पष्टता नाही. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनीच प्रश्नाबाबत तोडगा काढावा असा मुद्दा मी मांडला होता असे अनिल परब यांनी सांगितले. 

शांतता क्षेत्रात (सायलेंन झोन) कोणतीही परवानगी देण्याचा पोलिसांना अधिकार नाही अशी भूमिका पोलिसांकडून या बैठकीच्या वेळी मांडण्यात आली. त्यावेळी अनिल परब यांनी आक्षेप घेतला. 80 टक्के गणेशोत्सव मंडळे सायलेंन झोन मध्ये येत आहेत,त्यांना परवानगी कोण देणार असा सवाल अनिल परब यांनी बैठकीत उपस्थित केला होता. मुंबईत गणेश उत्सव कसा साजरा होणार अशी चिंताही परब यांनी यावेळी व्यक्त केली. 

मुंबईतील भौगोलिक परिस्थिति बघता 80 टक्के मंडळे ही सायलेन्स झोन मध्ये येतात. त्यामुळे गेली 100 वर्षे चाललेला हा मुंबईतील उत्सव केवळ कोर्टाच्या आदेशाने बंद होत असेल तर शिवसेना त्याला विरोध करेल असा इशारा अनिल परब यांनी दिला. न्यायालय कायदा बघते, लोकांची श्रध्दा बघत नाही, राज्य सरकारने आता याचा विचार करावा यासाठी लवकर बैठक लावावी अशी विनंती अनिल परब यांनी मुख्यमंत्र्याकडे पत्र पाठवून केल्याचे सांगितले. 

मुंबईतील हजारो गणेशोत्सव मंडळावर शिवसेनेची पकड आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या अडीअडचणी आणि प्रश्नाबाबत मुख्यमंत्री दरबारात चर्चा होऊन मार्ग निघणार असेल तर त्याचे श्रेय भाजपला मिळावे यासाठी शेलार यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. त्यातून शेलार यांनी काही गणेश मंडळांशी भेटीगाठी करून शिवसेनेला कोणतीही कल्पना न देता मुख्यमंत्री फडणवीस याची भेट घेऊन त्याची माहिती माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला असे सूत्राकडून सांगण्यात येते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com