अंतिम तोडगा निघेपर्यंत शेतकरी आंदोलन  सुरु ठेवणार, सुकाणू समितीचा निर्धार 

अंतिम तोडगा निघेपर्यंत शेतकरी आंदोलन  सुरु ठेवणार, सुकाणू समितीचा निर्धार 

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांवर शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीमध्ये एकमत असून, राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी सुकाणु समितीचे 35 प्रतिनिधी मंत्रीगटाशी चर्चा करण्यासाठी उद्या केली जाणार आहेत; असा निर्णय शनिवारी माहिम येथे शेतकऱ्यांच्या संघटनेच्या सुकाणू समितीच्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला. अंतिम तोडगा निघेपर्यत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धारही यावेळी बैठकीत घेण्यात आला. 

शेतकऱ्यांच्या विविध संघटनांशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगटाची उच्चाधिकार समिती स्थापन केली आहे. या समितीने रविवारी दुपारी 1 वाजता शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले आहे. त्याअनुषंगाने राज्य सरकारपुढे कोणत्या प्रमुख मागण्या ठेवायच्या यावरुन एकमत व्हावे यासाठी सुकाणू समितीच्या प्रतिनिधींची शनिवारी दुपारी 3 वाजल्यापासून सुमारे अडीच तास बैठक झाली. या बैठकीला स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्ठी, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, अशोक ढवळे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे. शेतीमालाला योग्य तो हमीभाव मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अमलबजावणी करा या मागण्यांवर आम्ही ठाम आहोत. कोणाला वेठीस धरण्याची आमची इच्छा नाही असे राजू शेट्टी यावेळी म्हणाले. 

शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. उद्या रविवारी शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आम्ही जाणार असलो तरी राज्य सरकारच्या मनात नेमके काय आहे ते आम्हाला समजेल. 90 टक्के मागण्या मान्य झाल्याचा दावा सरकार करत आहे ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या मागणीवर ऑक्‍टोबरपर्यंत निर्णय घेवू असे सरकार सांगत आहे. तेवढा वेळ थांबायला शेतकरी तयार नाही. सरकारशी केलेल्या चर्चेनंतर मागण्या मान्य झाल्या नाही तर मध्यप्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रात आंदोलन तीव्र करु असा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिला. 

या सुकाणू समितीच्या बैठकीला सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहीले असून, शेतकरी संघटनेत फुट पडली असा अपप्रचार केला जात आहे, तो चुकीचा आहे, असे शेकापचे जयंत पाटील म्हणाले. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com