यवतमाळ : अधिसूचित नसलेल्या कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांसोबतच संबंधित कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. बीजी-2 हे वाण बोंडअळीला प्रतिकारक असल्याचा दावा करूनही किडीला बळी पडत आहे. त्यामुळे बीजी-2चा अंतर्भाव संकरित कपाशी म्हणून करावा, असा प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पाठविला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
खोत म्हणाले की, "पोलिस' हे कीटकनाशक उसावरील किडीसाठी वापरले जाते. मात्र, यवतमाळ जिल्ह्यात कपाशीवरील कीडनियंत्रणासाठी त्याची विक्री झाली आहे. तसेच कृषी सेवा केंद्रातून फवारणीसाठी कीटकनाशकांचे प्रमाण वाढविण्याचे सांगण्यात आले. त्यामुळेही विषबाधेची तीव्रता वाढली. हा सल्ला देणाऱ्या केंद्र संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि दोषी कंपन्यांवर कारवाई केली जाईल. उपचार सुरू असलेल्या रुग्णांचा खर्च रुग्ण कल्याण समितीमार्फत केला जाईल.
नाशिकच्या धर्तीवर राज्यभरात आता कृषी ग्राम समित्यांची स्थापना केली जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जागा उपलब्ध करून दिली जाईल, असेही ते म्हणाले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.