बारणेंना महापालिकेत चार नगरसेवक  निवडून आणता आले नाहीत : एकनाथ पवार   

यानिमित्तानेे शहर शिवसेना आणि भाजपमधील कलगीतुरा तिसऱ्या दिवशीही सुरूच राहिला आहे.
बारणेंना महापालिकेत चार नगरसेवक  निवडून आणता आले नाहीत : एकनाथ पवार   

पिंपरी: " मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना आपण फार लोकप्रिय नेते असल्याचा वारंवार भास होतो. त्यांच्या बगलबच्च्यांना बारणे हे फार मोठे नेते असल्याची आणि ते नक्की खासदार होणार, अशी स्वप्ने पडतात. एवढीच लोकप्रियता होती आणि ते फार मोठे नेते होते, तर महापालिका निवडणुकीत त्यांना चार नगरसेवक तरी निवडून का आणता आले नाहीत? असा पलटवार पिंंपरी चिंंचवड महापालिकेतील भाजपचेे  पक्षनेते एकनाथ पवार यांनी आज केला.

यानिमित्तानेे शहर शिवसेना आणि भाजपमधील कलगीतुरा तिसऱ्या  दिवशीही सुरूच राहिला आहे.

बारणेंना शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी पुन्हा देऊ नये,अन्यथा भाजप त्यांचे काम करणार नाही. त्यामुळे त्यांचा पराभव होईल, अशी मागणी पवार व इतर सहा भाजप नगरसेवकांनी दोन दिवसांंपूर्वी केली होती. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मदत व्हावी म्हणून ती केल्याचे उत्तर या मागणीवर शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर व इतर पदाधिकारी यांनी काल दिले होते. त्याचा पवार यांनी आज पत्रक काढून समाचार घेतला. त्यांनी पुन्हा बारणेंवर जोरदार टीकास्त्र सोडले.

पवार म्हणतात,"बारणे हे नेहमी स्वतःच्या आत्मप्रौढी राजकीय विश्वात जगत असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांचे नुकसान होत आहे. बारणे यांनी मावळ मतदारसंघात कोणतेच काम केलेले नाही. केवळ पक्षांतर्गत भांडणे लावण्यातच त्यांनी खासदारकीची टर्म वाया घालवली आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मतदारांमध्ये मोठी नाराजी आहे. जर मतदारांनी त्यांना नाकारले, तर भाजपचेही नुकसान होणार आहे. तसेच बारणे हे पराभवाचे खापर भाजपवर फोडण्यास मोकळे होतील. बारणे हे काही शिवसेनेचे निष्ठावान नाहीत. ते काँग्रेसमधूनच शिवसेनेत गेले आहेत. त्यामुळे जनतेत नाराजी असणाऱ्या आणि भाजपला कधीही विश्वासात न घेणाऱ्या उमेदवाराचे आम्ही काम का करायचे?"

बारणे मूळचे काँग्रेसवाले आहेत असे सांगून ते पुढे म्हणतात,  " बारणे हे काही निष्ठावान शिवसैनिक नाहीत. ते काँग्रेसमधूनच शिवसेनेत गेलेले आहेत. त्यांनी गजानन बाबर यांच्यासारख्या एका निष्ठावान शिवसैनिकाचा राजकीय बळी घेऊन  खासदारकी पटकावलेली आहे, हे सर्व जनतेला अजूनही ज्ञात आहे. आता पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या संघटनेवर त्यांच्या बगलबच्च्यांनी ताबा मिळवला आहे. शिवसेना म्हणजे आमचाच सात-बारा असल्यासारखे वागणाऱ्या बारणे यांच्या बगलबच्च्यांनी आपल्या नेत्याने अख्ख्या राजकीय जीवनात एका तरी कार्यकर्त्याला ताकद देऊन मोठे केले आहे का? हे आधी दुर्बिण लावून तपासून पाहावे. त्यात त्यांना सत्य काय ते दिसेल. "

" आमचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आम्ही भाजपच्या निष्ठावान पदाधिकारी व नगरसेवकांनी बारणे यांचे काम करण्यास लावू नका म्हणून निवेदन दिले. परंतु, त्याला प्रत्युत्तर देणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांपैकी एक तरी निष्ठावान शिवसैनिक आहे का? बारणे यांचे काम करणार नाही, असे सांगणारे भाजपचे 400 निष्ठावान कार्यकर्ते आम्ही उभे करून दाखवतो. बारणे यांनी त्यांच्या मागे किमान 100 निष्ठावान शिवसैनिक आहेत हे दाखवून द्यावे." 

" बारणे यांच्या कुचकामी प्रवृत्तीमुळे शिवसेनेचा घात होईल आणि भाजपचेही नुकसान होईल. त्याची भिती वाटल्यानेच आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या नेत्यांना स्पष्टपणे सांगण्याचे  केले. ही बाब खासदार बारणे आणि त्यांच्या बगलबच्च्यांना खटकल्याचे दिसत आहे. शिवसेनेने कोणाला उमेदवारी द्यावी, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, युती झाली आणि मावळ मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला, तर शिवसेनेने जिंकून येणाऱ्यालाच उमेदवारी द्यावी, या भूमिकेवर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते  अद्माप ठाम आहेत," असेही ते म्हणाले . 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com