मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका...नाही तर पाडापाडी होईल : अजित पवार

मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका...नाही तर पाडापाडी होईल : अजित पवार

माळेगाव :  लोकसभा, विधानसभा निवडणुकांची दिशा अद्याप स्पष्ट नाही. साहेब अथवा माझे नाव घेवून पंतप्रधान, मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा करू नका. मित्रपक्षांना बरोबर घेवून खरेतर भाजप व शिवसेनेचे जातियवादी सरकार घालवून काॅग्रेस व राष्ट्रवादीचे बहुमत मिळविण्याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

भाजपचा पाच राज्यात पराभव झाल्यामुळेच त्यांना कर्जमाफीच्या चर्चेतून आता शेतकऱ्यांची आठवण होऊ लागल्याचा टोला पवारांनी मारला. पणदरे-कुरणेवाडी (ता.बारामती) येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते.

``लोकसभेच्या जागा वाटपाचा अंतिम टप्पा काॅग्रेस,राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्टींनी गाठला आहे.  त्या प्रक्रियेत खरेतर निवेदिता माने यांनी संयम राहणे आवश्यक होते. परंतु मित्रपक्षाचे राजू शेट्टींना जागा जाईल असे गृहित धरून त्यांनी शिवसेनेत जाण्याचा मार्ग स्वीकारला, अशी माहिती पवार यांनी सांगितली.

पदांच्या उल्लेखामुळेच पाडापाडीचे राजकारण होते आणि या पाडापाडीमुळेच आमची माती झाली आहे, असे ते म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. एका स्थानिक नेत्याने आपल्या भाषणात अजित पवार यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला होता. तोच धागा पकडून अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना असा उल्लेख न करण्याची विनंती केली. भावी मुख्यमंत्री म्हटल्याने कोणाच्या भावना दुखावल्या जातात किंवा कोणाला पसंत पडत नाही, असाही सल्ला त्यांनी दिला.

कांदा, साखर, दूधासह शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा सरकारच्या विरुद्ध उद्रेक झाला. त्यांचा तीव्र रोष भाजप सरकारचा पाडाव करण्यासाठीच पाच राज्यांच्या निवडणूकात शेतकऱ्यांनी निर्णायक भूमिका घेतली. त्यामुळेच आता केंद्राकडून पुन्हा कर्जमाफीची चर्चा केली जात आहे, अर्थात गमावलेला जनाधार मिळविण्याचा केविलवाणी प्रकार भाजपवाल्यांकडून केला जात आहे, अशी टीका त्यांनी केली.

ते म्हणाले,``शेतीसह उद्योग धंद्यात मंदी, दुष्काळी स्थिती, कर्जमाफीचे धरसोडीचे धोरण असल्याने बॅंकाच्या वसूलीवर विपरित परिणाम झाला. परिणामी शेतकऱ्यांना बॅंका दारात उभे करीत नाही, याला केंद्र व राज्य सरकार आहे. बेरोजगारीसह निर्माण झालेल्या प्रतिकूल स्थितीवर मार्ग वाढण्याऐवजी हे सरकार राम मंदीर, हनुमानाची जात, पुतळे उभारणी, धार्मीक प्रश्न, शहरांची नावे बदलण्याची चर्चा भाजपवाले करीत आहेत. त्यात शिवसेनेचा दुटप्पीपणा तर लोकांना नकोसा झाला आहे.

सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, माळेगावचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, सभापती संजय भोसले, संदीप जगताप, संभाजी होळकर, योगेश जगताप, रविराज तावरे, रोहित कोकरे, सतिश तावरे, कुरणेवाडीचे सरपंच अलंकार जगताप आदी शेतकरी उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com