औरंगाबाद, जालना उद्योगांसाठी "मॅग्नेट' ठरतील - देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद, जालना उद्योगांसाठी "मॅग्नेट' ठरतील - देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद : शेजारी राज्यांपेक्षा विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योगांना कमी दरामध्ये वीज उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग देखील मराठवाड्याला उद्योगाच्या दृष्टीने खूप फायद्याचा ठरणार आहे. या महामार्गामुळे औरंगाबाद आणि जालना हे दोन जिल्हे उद्योगांसाठी मॅग्नेट ठरणार असल्याचा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

हैदराबादा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण समारंभ प्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला मागसलेपणातून मुक्त करायचे आहे, या भागाला विकासाची भूक असल्याचे सांगितले. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी आतापर्यंत 15 हजार कोटींचा निधी या भागात दिल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. शिवाय या भागातील सिंचनाचा अनुशेष भरून काढत अपुर्ण प्रकल्पांना देखील भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे मराठवाड्याची वाटचाल दुष्काळमुक्तीच्या दिशनेने सुरू आहे असे ते म्हणाले. 

राज्यातील एकुण शेततळ्यांपैकी 35 टक्के शेततळी एकट्या मराठवाड्यात बांधण्यात आली आहेत. वॉटर ग्रीडच्या 14 प्रकल्पांमुळे मराठवाड्यातील उद्योग, सिंचन आणि शेती, पिण्यासाठी पाणी पुरवले जाणार आहे. जलयुक्त शिवारची सर्वाधिक कामे या भागात करण्यात आल्यामुळे 60 हजार हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येईल असे स्पष्ट करतांनाच सरकारचा या भागातील शेती, सिंचन आणि औद्योगिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

मराठवाड्यामुळेच देश एकसंघ 
मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळेच भारत एकसंघ राहू शकला. मराठवाडा हे भारताचे अविभाज्य अंग आहे आणि ते भारतातच राहिले पाहिजे या भावनेतून येथील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी निजामाशी मोठा लढा दिला असे गौरवोद्दगार देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले. भाषावार प्रांतरचना झाली तेव्हाही मराठवाड्याने महाराष्ट्रातच राहणे पसंत केले, त्यामुळे येथील जनतेचे करावे तेवढे कौतुक थोडेच असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठवाड्याच्या विकासावर आधारित "अग्रेसर मराठवाडा' या पुस्तिकेचे प्रकान देखील करण्यात आले. 


विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष देवयानी डोणगांवकर, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, सतीश चव्हाण, भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर, अतुल सावे, प्रशांत बंब हे आमदार व जिल्हाधिकारी उदय चौधरी आदीची उपस्थिती होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com