रावसाहेब दानवेंचा आवाज बसला 

रावसाहेब दानवेंचा आवाज बसला 

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा आवाज बसला आहे. त्यांच्यावर गेल्या महिन्यात फार टीका झाल्यामुळे नव्हे तर त्यांचा आवाज वैद्यकीयदृष्ट्या बसला आहे. ते फारसे बोलू शकत नाहीत. 

शेतकऱ्यांच्या प्रति "साले' हा शब्द वापरल्याने दानवे हे गेले पंधरा दिवस वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर त्यांनी फार जाहीर कार्यक्रम केले नव्हते. आज मात्र त्यांनी पुण्यात हजेरी लावली. 

केंद्रातील भाजप सरकारने गेल्या तीन वर्षांत केलेल्या कामाचा प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी पुणे शहर भाजपने रथ तयार केला आहे. पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती मंदिराच्या प्रांगणात या रथाचे उद्‌घाटन दानवे यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर मुक्ता टिळक, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, शहर भाजपचे अध्यक्ष योगेश गोगावले आदी उपस्थित होते. आवाज बसलेला असल्यामुळे दानवे यांना फार वेळ भाषण करता आले नाही. तरीही त्यांनी त्या स्थितीत भाजप सरकारचे काम जनतेपर्यंत पोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज असावे, असे आवाहन केले. थोडक्‍यात बोलून त्यांनी आपले भाषण संपविले. 

अर्थात दानवे फार वेळ बोलले नाहीत, याचे कार्यकर्त्यांनी म्हणे समाधान व्यक्त केले. न जाणो चुकून एखादा शब्द बाहेर पडला असता तर आणखी वाद निर्माण झाला असता. भाजपच्या प्रदेश शाखेने गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांशी थेट शिवारावर जाऊन संवाद साधण्यासाठी यात्रा आयोजित केली होती. त्यात दानवे यांना आमच्याकडे पाठवू नका, अशी विनंती काही आमदारांनी केली होती. सध्या शेतकऱ्यांच्या संपाचा बोलबाला सुरू आहे. या कालावधीत दानवेंचा "आवाज बसणे', हे भाजपसाठी सुस्करा सोडण्यासारखेच आहे, अशी खोचक प्रतिक्रिया विरोधी नेत्याने व्यक्त केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com