अयोध्येतील नागरिकांना बाळासाहेब व शिवसेनेबद्दल प्रचंड आदर - अंबादास दानवे

 अयोध्येतील नागरिकांना बाळासाहेब व शिवसेनेबद्दल प्रचंड आदर - अंबादास दानवे

औरंगाबाद : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 25 नोव्हेंबररोजीच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त तेथील साधू-संत व सर्वसामान्य लोकांशी जवळून संपर्क आला. त्यांना शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेबद्दल प्रचंड आदर आणि आपुलकी असल्याचे जाणवले. तशा भावना त्यांनी बोलून दाखवल्या. पंचवीस वर्षानंतर शिवसेनेने पुन्हा राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला आहे, राम मंदिर सरकारच बांधेल पण त्याला शिवसेनेचा दबावच कारणीभूत ठरेल असे मतदेखील अयोध्येतील साधू-संत व सर्वसामान्यांनी व्यक्त केल्याचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले. 

उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. हा दौरा आणि पक्षप्रमुखांची जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार व शेकडो शिवसैनिक सहा महिन्यांपासून अयोध्येत मेहनत घेत आहेत. औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचा देखील आयोध्या दौऱ्याच्या तयारीत सहभाग आहे. अयोध्येतून नुकतेच परतलेल्या अंबादास दानवे यांनी तेथील वातावरण, शिवसेनेला मिळणारा स्थानिकांचा प्रतिसाद या संदर्भात माहिती दिली. 

दानवे म्हणाले, उध्दव ठाकरे यांच्या 24 आणि 25 नोव्हेंबरच्या अयोध्या दौऱ्यांची संपूर्ण उत्तर प्रदेश आतुरतेने वाट पाहतोय. राम मंदिर न्यासाचे साधू-संत यांची भेट आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा योग आला. 25 वर्षापुर्वी शिवसैनिकांमुळेच अयोध्येतील कलंक पुसला गेला होता. आता पुन्हा शिवसेनेनेच राम मंदिराचा मुद्दा हाती घेतल्यामुळे सरकारवर राम मंदिर बांधण्यासाठी दबाव तयार होईल असे मत संत-महंत व्यक्त करतात. त्याचप्रमाणे अयोध्येतील सामान्य नागरिकांना देखील उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कुतूहल असल्याचे दिसून आले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेबद्दल तेथील लोक भरभरून बोलतात. " हम उध्दव ठाकरेजी का अयोध्या मे स्वागत करते है' अशा उस्फूर्त प्रतिक्रिया देखील लोकांकडून येत आहेत. 

आठवडाभर आधीच शिवसैनिक आयोध्येत... 
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा 24 तारखेपासून सुरू होत आहे. दीड दिवसांच्या या दौऱ्यात त्यांचे नियोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिकांचे जथ्थे अयोध्येत दाखल होणार आहेत. औरंगाबादहून टप्याटप्याने शिवसैनिक जाणार आहेत. उद्यापासून शिवसैनिक अयोध्येकडे रवाना होणार आहेत. जिल्ह्यातून तीनशे ते चारशे शिवसैनिक 17, 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी आयोध्येला जातील. खाजगी वाहने, रेल्वे आणि विमानाने देखील काही शिवसैनिक जाणार असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com