युतीतील धुमशान सुरु असताना काँग्रेस- राष्ट्रवादीत ५०:५० टक्के जागांचा फॉर्म्युला !

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी याबाबत लवकरच निर्णय घेणार आहेत. मित्रपक्षांसाठीही 26 जागा राखीव ठेवण्याचा मानस राष्ट्रवादीने व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
Sharad-Pawar-Rahul-Gandhi
Sharad-Pawar-Rahul-Gandhi

मुंबई  : शिवसेना आणि भाजपमध्ये आगामी निवडणुकात एकत्र यायचे की  नाही यावरून धूमशान सुरु असतानाच शरद पवार यांनी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आगामी निवडणुकांसाठी ५०:५० जागावाटपाचा फॉर्म्युला ठरविण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे वृत्त आहे . 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी याबाबत लवकरच निर्णय घेणार आहेत. मित्रपक्षांसाठीही 26 जागा राखीव ठेवण्याचा मानस राष्ट्रवादीने व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सध्या दोन्ही पक्षाच्या जागावाटपाचे सूत्र निश्‍चित करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. स्थानिक नेत्यांच्या आग्रहामुळे एखाद-दुसऱ्या जागेवरून मतभेद होणार नाहीत, याचीही काळजी घेत हे दोन्ही नेते चर्चा करून निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले.

दोन्ही काँग्रेसमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला तर पुढेच पाऊल मतदारसंघांचे वाटप असणार आहे . त्यामुळे शिवसेना - भाजपमध्ये युती करायची की नाही यावरून संगीत मानापमान नाट्य आणखी कितीवेळ चालते हे महत्वाचे वेळ ठरणार आहे . युतीत भांडणे सुरु असतानाच दोन्ही काँग्रेसचे मित्रपक्षांसह मतदारसंघ ठरल्यानंतर प्रचारात निर्णायक आघाडी घेण्याची संधी काँग्रेस आघाडीला राहणार आहे . 

गत विधानसभा निवडणुकीत स्वबळावर आमने-सामने आल्यानंतर दारुण पराभव पत्करलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आता आघाडीचे सूर जुळवण्याचा निर्धार केला आहे. सध्या दोघांचे संख्याबळ समान असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपात 50-50 टक्‍क्‍यांचे सूत्र असावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने कॉंग्रेससमोर ठेवल्याचे समजते. 

निम्म्या-निम्म्या जागा कॉंग्रेस-राष्ट्रवादीने लढवल्यास आणि मित्रपक्षांना 26 जागा दिल्यास समविचारी मते फुटण्याचा धोका नाही. तसेच भाजप-शिवसेना युतीला टक्‍कर देण्यासाठी हे सूत्र योग्य ठरेल, असे बोलले जात आहे. सध्या विधानसभेत कॉंग्रेसचे 45; तर राष्ट्रवादीचे 44 आमदार आहेत. लोकसभेत राष्ट्रवादीचे चार आणि कॉंग्रेसचे केवळ दोनच खासदार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या जागावाटपात पूर्वीप्रमाणे अखेरच्या क्षणापर्यंत घोळ राहू नये, यासाठी आतापासूनच सूत्र ठरवण्यावर भर दिला जात आहे. 

जागावाटपाचा प्रस्ताव तयार असला; तरी त्याबाबतची अधिकृत माहिती नसल्याचे दोन्ही पक्षातील सूत्रांनी सांगितले. मात्र शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या बैठकीत लवकरच अंतिम निर्णय होईल, या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला.

.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com