अमित शहांच्या उपस्थितीत नागपुरात अनुसूचित जातीची राष्ट्रीय परिषद ; भाजपचा खरा चेहरा उघड झाला- नितीन राऊत
भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती-जमाती आघाडीची राष्ट्रीय परिषद येत्या 19 जानेवारीला नागपुरात होणार आहे. या परिषदेच्या समारोपासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दलित समाजातील असंतोष दूर करण्यासाठी ही राष्ट्रीय परिषद आयोजित केल्याचे बोलले जात आहे. नागपुरात दीक्षाभूमी असल्याने या परिषदेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
नागपूर : भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती-जमाती आघाडीची राष्ट्रीय परिषद येत्या 19 जानेवारीला नागपुरात होणार आहे. या परिषदेच्या समारोपासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दलित समाजातील असंतोष दूर करण्यासाठी ही राष्ट्रीय परिषद आयोजित केल्याचे बोलले जात आहे. नागपुरात दीक्षाभूमी असल्याने या परिषदेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. नागपूर व विदर्भातील दलित समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर असून जवळपास 20 टक्के मतदार या वर्गातील आहेत. विदर्भातील 10 लोकसभा मतदारसंघांपैकी 2 मतदारसंघ (रामटेक व अमरावती) अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर आलेल्या असताना दलित समाजातील नाराजी दूर करण्यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे, यावर या परिषदेमध्ये प्रामुख्याने चर्चा होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या परिषदेला हजर राहणार असल्याने या परिषदेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भाजपचा खरा चेहरा उघडा झाला- राऊत
दलिताबाबत भाजपचा खरा चेहरा आता उघडा झाला आहे. अनुसूचित जाती-जमातीच्या परिषदा घेऊन भाजपने समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नये, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अनुसूचित सेलचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी केली आहे. भाजपने परिषद घेण्यापेक्षा गेल्या साडेचार वर्षांपासून दलितांवर होत असलेल्या अन्यायाची योग्य चौकशी करून आरोपींना शिक्षा करण्याची आवश्यकता आहे. नुकतेच आग्रा येथे संजलीला जिवंत जाळण्यात आले. यापूर्वीही दलितांवर अनेकदा अन्याय झाले. दलित युवक घोड्यावर बसला म्हणून मारहाण करण्यात आली. या प्रकारांना आळा न घालता नागपुरात परिषद घेणे हे उसने अवसान आणल्यासारखे असल्याचा टोला राऊत यांनी 'सरकारनामा'शी बोलताना लगावला.