हर्षवर्धन पाटील हायवेवर उतरून जाब विचारणार!

१९ वर्षामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली नसल्याचे ते सांगू लागले आहेत.
हर्षवर्धन पाटील हायवेवर उतरून जाब विचारणार!

वालचंदनगर (पुणे) : विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येवू लागली आहे, तसतसे तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍न पेटू लागला असून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील पाण्याच्या प्रश्‍नावरुन आमदार दत्तात्रेय भरणे यांना कोंडीत पकडू लागले आहेत.

पाण्याच्या प्रश्‍नासाठी गुरुवारी (ता.२०) कॉग्रेसच्यावतीने पुणे - सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. 

२०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये तालुक्यात परिवर्तन झाले. भरणे यांनी माजी सहकारमंत्री पाटील यांची १९ वर्षाची सत्ता उलथवून लावली. बघताबघता चार वर्षे संपत आली आहेत. चार वर्षानंतर तालुक्याच्या विकासावरुन आरोपप्रत्यारोपाला सुरवात झाली आहे. गेल्या वर्षापासुन हर्षवर्धन पाटील यांनी आमदार भरणेंवर टिकेची झोड उडविण्यास सुरवात केली आहे. १९ वर्षामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली नसल्याचे ते सांगू लागले आहेत. तर भरणे १९ वर्षात काय केले ? असे विचारत आहेत.

गतवर्षी सात हजार एकरावरील पिके कालव्याचे पाण्याचे नियोजन न झाल्यामुळे जळाली. तसेच सणसर कटमधून गेल्या चार वर्षात पाण्याचा एक थेंब ही आला नसल्याने पाण्याची वाट मोडू लागली असल्याचे पाटील सांगत आहेत. चालू वर्षी मार्च महिन्यामध्ये निरवांगी येथे नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी उपोषण, रास्तारोको, काळ्या गुढ्या उभारणे व मुंडन करण्याचे आंदोलन केले होते. मात्र तरीही प्रशासनाने पाणी सोडण्यास नकार दिल्यामुळे नीरेच्या पाण्याचा प्रश्‍न पेटला होता. तर भरणे कालव्याच्या इतिहासामध्ये चालू वर्षी सर्वार्धिक काळ नीरा डाव्या कालव्याला पाणी सुरु असल्याचे ठासून सांगत आहेत. 

चालू वर्षी जुनपासुन पावसाने तालुक्याकडे पाठ फिरवल्यामुळे पावसाळ्यातही पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. तसेच पाउस नसल्यामुळे  तालुक्यातील सर्व तलाव कोरडे असुन पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न तापू लागला आहे. आठ  दिवसापूर्वी खडकवासल्याचे  सुरु असलेल्या पाण्याचे आवर्तन अचानक बंद झाल्यामुळे शेतकरी वैतागले होते.

हर्षवर्धन पाटील यांनी तातडीने शेतकऱ्यांची अडचण ओळखून गुरुवार (ता.२०) रोजी रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेवून गावोगावी बैठका घेवून आंदोलनाची तयारी जोरदार सुरु केली. आमदार भरणे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, माजी जिल्हापरिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी ही दोन दिवसापूर्वी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेवून अधिकाऱ्यांना धारेवर धरुन तातडीने पाणी सोडण्याची मागणी करुन खडकवासल्याचे बंद झालेले पाणी सुरु केले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com