मुख्यमंत्र्यांची महापालिका बरखास्तीची तंबी आयुक्तांना की शिवसेनेला ? 

निविदा प्रक्रियेला वर्ष लागते का?शहरातील रस्त्यांसाठी गेल्यावर्षी शंभर कोटींचा निधी दिला होता. आणखी शंभर कोटी देणार होतो पण आधीचा निधी मिळून वर्ष उलटले तरी तुमच्या ई-निविदाच अजून अंतिम झाल्या नाही. निविदेसाठी एक वर्ष लागते. असेच काम चालत असेल तर हा विभाग बदलून टाका अशी सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना बैठकीत दिली.
CM-Nipun-Vinayak-
CM-Nipun-Vinayak-

औरंगाबाद :  शहरातील कचराकोंडी फोडण्यात महापालिका प्रशासनाला अद्याप यश न आल्यामुळे नागपूरात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री चांगलेच संतापले.

कचरा प्रश्‍न सोडवण्यासाठी दोन दिवसात रोडमॅप तयार करा, तुमच्यावर कुणी दबाव आणत असेल तर थेट मला फोन करा, पण आता हलगर्जीपणा, दिंरगाई खपवून घेणार नाही अशा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त डॉ. निपूण विनायक यांना दिला.

तुमच्याकडून प्रश्‍न सुटत नसेल तर महापालिकाच बरखास्त करतो अशी तंबी देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे बैठकीतले वातावरण गंभीर बनले होते. 

पाच महिन्यापासून शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न जैसे थे आहे. नागरिकांकडून सत्ताधारी पक्षांवर टोकाची टिका होत आहे. पाऊस सुरू झाल्याने साचलेल्या कचऱ्यातून भयंकर रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झालेला असतांना प्रशासन मात्र ढिम्मच  आहे. बुधवारी शहरातील कचरा प्रश्‍नावर नागपूरात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त डॉ. निपूण विनायक यांना फैलावर  घेतले. 

बैठकीच्या सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पाच महिने उलटले तरी रस्त्यावरचा कचरा का संपत नाही ? असा थेट प्रश्‍न आयुक्तांना करत नाराजी व्यक्त केली. त्यावर आयुक्तांनी केलेल्या कामांची माहिती देत सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. 

बागडे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना ,कचरा कधी संपणार याचा रोडमॅप तयार आहे का? निविदा प्रक्रिया कधी संपणार? कचऱ्यावर प्रक्रिया कधीपासून सुरू होणार? अशा प्रश्‍नांचा भडीमार केला. तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का? एवढे दिवस काय केले? दोन दिवसात रोडमॅप सादर करण्याचे आदेश दिले.

शेवटी जर वेळेवर कामे होत नसतील तर महापालिकाच बरखास्त करून टाकतो असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी आयुक्त निपूण यांना दिला. तुमची बदली औरंगाबादला कशासाठी केली? कचरा संपविण्यासाठीच ना? मग पाच महिन्यात काम का झाले नाही असा जाब विचारत मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. 

मुख्यमंत्र्यानी महापालिका बरखास्तीची तंबी आयुक्तांना दिली की शिवसेनेला याबाबत चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे . महापालिका बरखास्त झाली तर आयुका महापालिकेचे प्रशासक बनतात . नगरसेवकांच्या गैरहजेरीत प्रशासकांची अधिकार खूप वाढतात . त्यामुळे आय. ए. एस . अधिकारी कोणत्याही महापालिकेत आयुक्त म्हणून  जाण्यापेक्षा प्रशासक म्हणून जाण्यास अधिक इच्छुक असतात . 

औरंगाबाद महापालिका शिवसेनेचे पॉवर हाऊस मानली जाते . महापालिकेतून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल यांच्यासारखे अनेक नेते उदयाला आलेले आहेत . महापालिकेत शिवसेना आणि भाजपची युती आहे . सध्या महापौर पद शिवसेनेचे नंदकुमार घोडेले यांच्याकडे आहे . एम. आय.एम.चे आमदार इम्तियाज जलील यांनी कचऱ्याच्या निविदात सत्त्ताधारी शिवसेना नगरसेवकांचे  आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याचा आरोप केला होता . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com