मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल तेव्हाच खरा जल्लोष - भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेल तेव्हाच खरा जल्लोष - भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर

औरंगाबाद : राज्य मागसवर्ग आयोगाचा अहवाल आणि त्यामधील शिफारशीच्या आधारावर सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण जाहीर केले आहे. सरकारने उचललेले हे सकारात्मक पाऊल आहे, आणि म्हणून त्याचे मी स्वागत करतो. सत्ताधारी पक्षाकडून सगळीकडे जल्लोष सुरू आहे, पण हे अतिघाईचे आहे असे मला वाटते. सर्वोच्च न्यायालयात जेव्हा हे आरक्षण टिकेल तेव्हाच खरा जल्लोष साजरा होईल असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वैजापूर येथील आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी "सरकारनामा' शी बोलतांना व्यक्त केले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी चिकटगांवकर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. मराठा आरक्षण आणि त्यासंदर्भातील विधेयक सभागृहात मंजुर झाल्यानंतर यावर भाष्य करतांना चिकटगांवकर म्हणाले, राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण याआधीच देऊ शकले असते. पण साडेतीन चार वर्ष उलटल्यानंतर राज्य मागासवर्ग आयोग नेमण्यात आला, आणि आता कुठे मराठा आरक्षण जाहीर झाले. साडेतीन वर्ष सरकारने वेळकाढूपणा का केला ? हे समजायला मार्ग नाही. 

एटीआर अहवाल आणि विधेयक मंजुर झाल्यानंतर सरकारकडून राज्यभरात मराठा आरक्षण जाहीर केल्याचा जल्लोष साजरा केला जातोय. हे आरक्षण न्यायालयात टिकेल अशी अपेक्षा आहे. कारण याआधीच्या सरकारने मराठा, मुस्लिम आरक्षण जाहीर करतांना ज्या त्रुटी ठेवल्या होत्या, त्या आताच्या सरकारने बहुतांश दूर केल्या आहेत. राज्य मागसवर्ग आयोगाची स्थापना आणि त्या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकेल अशी खात्री आहे. पण प्रत्यक्ष ते टिकले आणि त्याचा लाभ समाजाला व्हायला लागेल तेव्हाच खऱ्या अर्थाने जल्लोष साजरा करण्यात अर्थ आहे. 

मराठा समाजाच्या दबावामुळेच आरक्षण 
आज मराठा समाज कुठेही रस्त्यावर उतरून जल्लोष साजरा करतांना दिसत नाहीये, त्याचे कारण हे आरक्षण सहज मिळालेले नाही, त्यासाठी समाजाला रस्त्यावर उतरावे लागले, 58 मोर्चे काढावे लागले, चाळीस मराठा तरूणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले. याची आठवण आणि दुःख समाजाच्या मनात आजही कायम आहे. गंगापूर तालुक्‍यातील काकासाहेब शिंदे या मराठा तरुणाने जलसमाधी घेतली तेव्हा हे सरकार खडबडून जागे झाले. त्यानंतर राज्यभरात मराठा आरक्षणासाठी समाजातील तरूण बलिदान देत होते. याचा उद्रेक झाला तर सरकार टिकणार नाही याची भिती सरकारला वाटू लागली आणि त्यानंतरच सरकारने गंभीरपणे पावले टाकायला सुरुवात केली होती. 
त्यामुळे आज मिळालेले आरक्षण हे मराठा समाज, चाळीसहून अधिक तरुणांनी दिलेले बलिदान, राज्यभरात निघालेले मोर्चे याचा परिणाम असल्याचेही भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com