अकोला : जनतेला 'अच्छे दिन' चे स्वप्न दाखवित केंद्र व राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारमधील अनेक मंत्र्याचे घोटाळे बाहेर आले आहेत. मात्र, स्वत:ला वाचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्ट मंत्री व अधिकाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचा हल्लाबोल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
मंत्री प्रकाश मेहता, आयएएस अधिकारी मोपलवार प्रकरणांची लोकायुक्तांकडून चौकशी करून मुख्यमंत्र्यांनी भ्रष्ट कारभारावर पांघरून टाकण्याचेच काम केले. पण या भ्रष्ट मंत्री व अधिकाऱ्यांना पाठिशी न घालता त्यांना हटवून त्यांची न्यायलीन चौकशी करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
अकोला जिल्ह्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधाकरराव गणगणे यांच्या निवासस्थानी रविवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी कॉंग्रेस नेते माजी मंत्री अजहर हुसेन, माजी आमदार नातीकोद्दीन खतीब, माजी आमदार लक्ष्मनराव तायडे, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, प्रदेश महासचिव मदन भरगड, मनपाचे विरोधी पक्षनेता साजीद खान पठान, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादाराव मते पाटील, लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष महेश गणगणे, डॉं सुभाष कोरपे, हेमंत देशमुख, डॉं. शैलेष देशमुख, प्रकाश तायडे, राजेश राऊत, नगरसेवक पराग कांबळे, सुषमा निचड, डॉं. स्वाती देशमुख, साधना गावंडे, विभा राऊत, राजेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी चव्हाण यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका केली. या सरकारच्या काळात सर्वसामान्य जनतेचे शोषण होत आहे. वाढती महागाई, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीच्या जाचक अटी लादून सरकार जनतेची पिळवणूक करीत आहे. राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले. पण स्वत:ला वाचविण्यासाठी मुख्यमंत्री भ्रष्ट मंत्री व अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत. जमिनीच्या प्रकरणात मंत्री प्रकाश मेहता मुख्यमंत्र्यांचे नाव घेत असताना मुख्यमंत्री त्यांना काढत नाहीत. याचा अर्थ मेहतांच्या नियमबाह्य कामांना त्यांचे समर्थन असल्याचे स्पष्ट होते.
मोपलवार प्रकरणात तर भाजपच्याच आमदारांनी पुरावे दिले असे सांगून ते म्हणाले,"" भ्रष्ट कारभाराला पाठिशी घालण्यात आले. माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे मुख्यमंत्र्यांचे पक्षातंर्गत प्रतिस्पर्धी असल्याने त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी न्यायालयीन चौकशी करीत त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. पण मेहतांचा राजीनामा न घेता केवळ लोकायुक्तांकडून चौकशीचा देखावा करून त्यांना पाठिशी घातले जात आहे. मेहतांचा तातडीने राजीनामा घेऊन त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून सत्य जनतेसमोर येऊ द्या. त्यात ते निर्दोष असतील तर त्यांना आणखी 'मलाई' चे खाते द्या असा टोला पृथ्वीराज बाबांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला.
या सरकारची वाटचाल अधोगतीकडे होत आहे. जनता महागाईने त्रस्त झाली असून सर्वत्र असंतोष पसरला आहे. त्याचा आगामी निवडणुकीत उद्रेक होऊन भाजपला या उद्रेकाचा सामना करावा लागणार असल्याचेही ते म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.