तयारी विधानसभेची : आढळराव लोकसभेला पराभूत झाल्यास वळसे पाटलांच्या विरोधात आमदारकी लढविणार?

तयारी विधानसभेची : आढळराव लोकसभेला पराभूत झाल्यास वळसे पाटलांच्या विरोधात आमदारकी लढविणार?

मंचर : आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून उमेदवारी मिळविण्यासाठी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अँड अविनाश रहाणे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सुरेश भोर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या जयश्री पलांडे आदी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. शिरूर लोकसभा निवडणूक निकालाच्या गणितावरच आंबेगावचा शिवसेनेचा उमेदवार ठरणार आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निश्चित आहे.

तुल्यबळ उमेदवाराचे नाव जाहीर करताना शिवसेना नेत्यांना येथे कसरत करावी लागेल. आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या सहा विधानसभा निवडणूका वळसे पाटील यांनी जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीत मताधिक्याची कमान वाढती ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत आंबेगाव मधून आढळराव यांनी १८ हजार ७०० मताधिक्य घेतले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अरुण गिरे यांना विधानसभेला उमेदवारी देवून वळसे पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न झाला होता. प्रत्यक्षात निवडणूक निकालात वळसे पाटील ५९ हजार मताधिक्याने विजयी झाले. त्यामुळे वळसे पाटील यांच्या विरोधात कोणता तगडा उमेदवार द्यावा याची खलबते शिवसेनेत सुरु झाली आहेत.

वळसे पाटील यांचा विजय रथ रोखण्यासाठी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कल्पना आढळराव पाटील यांना उतरविले होते. पण त्यांचाही पराभव झाला होता. वळसे पाटील यांना ३७ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. या उमेदवारा व्यतिरिक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एखादा मोठा कार्यकर्ता गळाला लावण्याची खेळीही  शिवसेनेकडून होवू शकते. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा कोणाला ग्रीन सिग्नल मिळणार यावर उमेदवारीचे गणित अवलंबून आहे. 

आंबेगाव विधानसभेला शिरूर तालुक्यातील ३९ गावे जोडलेली आहेत. तेथील  उमेदवार देण्याचा निर्णय झाल्यास जयश्री पलांडे यांच्या नावाचा विचार होवू शकतो. अरुण गिरे यांनी हि गेली पाच वर्ष मतदारसंघ पिंजून काढला आहे. या निवडणुकीत ते हि भक्कम दावेदार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरच आंबेगाव विधानसभेचा शिवसेनेचा उमेदवार ठरणार आहे. शिवसेनेच्या दुष्टीने लोकसभेला दगा फटका झाला तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याच्या हलचाली मातोश्रीकडून होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास वळसे पाटील विरुद्ध आढळराव पाटील अशी थेट लढत होवू शकते अशी चर्चा मतदारसंघात सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com