राष्ट्रवादी काँग्रेस : दोन दशके विश्वासाची

खरेतर पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्याची बांधणी करण्यात दशकांचा कालावधी जावा लागतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पक्कं केडर उभं रहावं लागतं. पण एखादा राजकीय पक्ष स्थापन झाल्यावर वर्षाच्या आत सत्तेवर येतो आणि त्यानंतर तब्बल दीड दशकं अर्थात पंधरा वर्षे तो सत्तेच्या केंद्रस्थानी असतो हे क्वचितच घडतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत हे घडलं. पक्षाच्या स्थापनेस १९ वर्षे पुर्ण होत असताना आतापर्यंतच्या वाटचालीचे सिंहालोकन करणे आवश्यक ठरते- सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेस : दोन दशके विश्वासाची

नेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असणारे मुंबईचे शिवाजी पार्क १० जुन १९९९ रोजी देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. मुंबईच्या रस्त्यांवर दुतर्फा कार्यकर्त्यांची गर्दी होती. सर्वत्र जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. मुंबईनगरी उत्साहाने सळसळत होती, याचे कारण म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार असणारे आणि देशातील मोठ्या नेतृत्त्वापैकी एक असणारे शरद पवार साहेब नव्या पक्षाची घोषणा करणार होते. लोक मोठ्या उत्कंठेने त्यांच्या भाषणाची वाट पाहत होते. साहेब भाषणाला उभे राहताच त्यांच्या जयजयकाराने अवघे शिवाजीपार्क अक्षरशः दुमदुमून गेले. 

आपल्या नेहमीच्या शैलीत साहेबांनी भाषणाला सुरुवात केली. साहेब म्हणाले, "दिल्लीमध्ये महाराष्ट्राची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी पराकाष्ठा करण्याची शपथ मी आपणा सर्वांच्या साक्षीने घेतो. नवा इतिहास निर्माण करण्याची ताकद या महाराष्ट्राच्या मातीत आणि तुम्हा सर्वांच्या मनगटात आहे. आणि त्यावर माझा विश्वास आहे." देशाला एक नवा विश्वास देताना साहेब पुढे म्हणाले, "सर्व जातींच्या आणि धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन भारतीयांची एक जबरदस्त शक्ती निर्माण करण्यासाठी आज पुन्हा एकदा नव्याने महात्मा गांधींचा विचार घेऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी मार्गस्थ होत आहे."  

पक्षाची स्थापना करताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा साहेबांनी दिलेला शब्द पक्षाच्या आजवरच्या वाटचालीत खरा करुन दाखविला आहे. साहेबांनी शिवाजीपार्कवरील त्या भाषणाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला समतेचा वस्तुपाठ हीच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील वाटचालीची शिदोरी असेल असे स्पष्टपणे नमूद केले होते. ही शिदोरी पाठीशी बांधूनच राष्ट्रवादीने आपली वाटचाल कायम ठेवली. 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मूल्याधिष्ठीत राजकारणाचा वसा घेऊन शरद पवार साहेब गेली अर्धा शतकाहून अधिक काळ राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या काळात झालेली विविध क्षेत्रातील कामे जनतेच्या लक्षात आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार असो सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने बहुजनांच्या मतांचा आदर करण्यात पवार साहेब नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. सहकारातून समृद्धीचा राजमार्ग प्रशस्त करताना खेड्यापाड्यातील जनता सुखी आणि समृद्ध व्हावी याकडे त्यांनी आवर्जून लक्ष पुरविले. आपल्या मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळात देशातील कृषीव्यवस्था अधिकाधिक बळकट व्हावी आणि त्याव्दारे शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी पोषक निर्णय घेतले. 
त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात एकेकाळी धान्य आयात करणारा आपला देश केवळ अन्नधान्याबाबत स्वयंपूर्णच झाला नाही तर अन्नधान्याची निर्यात करणारा एक प्रमुख राष्ट्र बनला. शेतीच्या क्षेत्रात मुलभूत संशोधनांना गती देण्याचे कार्यही त्यांच्याच काळात आवर्जून हाती घेण्यात आले. अन्नप्रक्रीया क्षेत्राला चालना देण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान इतिहासाला टाळताच येणार नाही. हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्त्व असणाऱ्या नेत्याने आजवर केलेल्या कामाचा जनतेला दीर्घकालीन फायदाच झाला आहे. म्हणूनच विकास कार्याबाबत शरद पवार हे अधिक विश्वासार्ह नाव आहे, याची जनतेला खात्री आहे. प्रत्यक्ष अनुभवातून देशभरात याची प्रचितीही आलेली आहे. म्हणूनच त्यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला अल्पवधीतच जनतेची पसंती मिळाली.

खरेतर पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्याची बांधणी करण्यात दशकांचा कालावधी जावा लागतो. पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पक्कं केडर उभं रहावं लागतं. पण एखादा राजकीय पक्ष स्थापन झाल्यावर वर्षाच्या आत सत्तेवर येतो आणि त्यानंतर तब्बल दीड दशकं अर्थात पंधरा वर्षे तो सत्तेच्या केंद्रस्थानी असतो हे क्वचितच घडतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत हे घडलं. पक्षाच्या स्थापनेस १९ वर्षे पुर्ण होत असताना आतापर्यंतच्या वाटचालीचे सिंहालोकन करणे आवश्यक ठरते. 

खरेतर १९-२० वर्षे हा काळ एखाद्या संघटनेसाठी फार मोठा काळ नाही. आता तर कुठे खरी सुरुवात झाली असून पक्षाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, असा संदेश देणारी वेळ आहे. आजघडीला समाजाच्या प्रत्येक स्तरात पक्षाच्या कार्यकर्त्याचे अस्तित्त्व आहे. पक्षाकडे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, गेल्या चार वर्षांत त्याचे मजबूत जाळ्यात रुपांतर केले आहे. हे जाळे पवार साहेबांसारख्या कणखर आणि कर्तबगार नेतृत्त्वाखाली पुर्वीपेक्षाही अधिक सक्रीयतेने कार्यरत राहील.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली सरकारने आपल्या दीड दशकांच्या शासनकाळात प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी, आरोग्य, कुटुंबकल्याण, सामाजीक न्याय, क्रीडा, उद्योग, ग्रामीण आणि शहरी विकास, पायाभूत सुविधांचे जाळे, उर्जा क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर भारनियमनातून मुक्ती अशा क्षेत्रात सरकारने केलेली कामे अभूतपुर्व अशी आहेत. निसर्गाचे संकट ओढावल्यावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने कधीच मागेपुढे पाहिले नाही. दुष्काळी परिस्थितीत बळीराजाला दिलासा देण्यासाठी सरकारने मोठी कर्जमाफी जाहीर केली. सध्याच्या सत्ताधाऱ्यांप्रमाणे शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी रांगेत उभे केले नाही. शेतकऱ्यांना शून्य अथवा कमी व्याजदराने शेतीसाठी पतपुरवठा कसा होईल याकडे लक्ष पुरविले. 

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश पुरविला. बचत गटाची व्यापक चळवळ चालवून महिलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखविला. शैक्षणिक क्षेत्रात पहिलीपासून इंग्रजीसारखा धाडशी प्रयोग जाणीवपूर्क राबविला. याची उत्तम फळे आता दिसू लागली आहेत. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान राखला. थातूर-मातूर कारणे देऊन शिक्षकभरती रोखून ठेवली नाही.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती कायम राखण्यासाठी सातत्याने स्वतंत्र आणि सक्षम गृहमंत्री दिला. गडचिरोलीसारख्या नक्षलप्रवण भागात अधिकारी देखील जाण्यास तयार नसताना तेथील पालकमंत्रीपद जाणीवपूर्वक स्वीकारुन प्रशासन आणि शासन व्यवस्थेत आत्मविश्वास भरण्याचे काम पक्षाचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी केले हे विसरून चालणार नाही. आजकाल असा आदर्श आणि विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न या सरकारकडून होत नाही ही खेदाची बाब आहे.

पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने हल्लाबोल यात्रेचा समारोपही होत आहे. या यात्रेच्या माध्यमातून सदैव ‘इलेक्शन मोड’वर असणाऱ्या विद्यमान राज्यकर्त्यांच्या काळात शासन व्यवस्थेपासून दूर गेलेल्या जनतेशी आम्ही पुन्हा एकदा नव्याने संवाद साधला. शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक, त्याच्या मालाला बाजारपेठेत मिळणारी कवडीमोल किंमत, त्यातून निर्माण झालेली उद्विग्नता, नोकरभरतीमध्ये कपातीचे धोरण व त्यामुळे हताश झालेला तरुण, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे कोलमडून पडलेला उद्योजक, महागाईमुळे घरखर्च चालविताना मेटाकुटीला आलेल्या गृहिणी, शिक्षणक्षेत्रात सुरु असलेली अनाठायी लुडबूड आणि नसते प्रयोग यामुळे हैराण झालेले शिक्षणक्षेत्र, ढासळलेली कायदा सुव्यवस्था, महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ, स्त्रीभ्रुणहत्येचा वाढलेला टक्का अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात या शासनकर्त्यांबाबत प्रचंड संताप आणि अविश्वास आहे. पिण्याचे पाणी, रस्ते, वीज अशा मुलभूत समस्यांचा निपटारा करण्यासाठीही जनतेला झगडावे लागत आहे. ही स्थिती महाराष्ट्राला कित्येक दशके मागे घेऊन जाण्यासाठी पुरेशी आहे. यामुळेच हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेच्या दारात जावून त्यांच्या समस्यांबाबत त्यांच्याशी थेट चर्चा केली. आता जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आता आम्ही आक्रमकपणे रस्त्यावर देखील उतरलो आहोत.   

जनतेच्या हितासाठी सदैव दक्ष राहण्याचा वसा घेऊनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजकारणात सक्रीय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा समतेच्या चळवळीतील कार्यकर्ता आहे. समाजातील प्रत्येक घटकाला जोडण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. सर्वसमावेशक, कल्याणकारी शासनव्यवस्थेचा तो पुरस्कर्ता आहे. राज्यातील जनता विद्यमान राज्यकर्त्यांच्या काळात सुखी नाही, हे उघड सत्य आहे. त्यामुळेच या सरकारच्या विरोधात यल्गार करण्यात पक्षाच्या अगदी शेवटच्या कार्यकर्त्याने सुद्धा पुढाकार घेतला आहे. या लढ्यात पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून इतर कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी स्वतः उतरले आहे. जोपर्यंत या राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलणार नाही तोपर्यंत हा संघर्ष कायम राहील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com