लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार : आठवले

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या जागा घटणार : आठवले

पिंपरी : लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत  भाजपची ताकद कमी होणार असून पक्षाला अडीचशेच जागा मिळतील, अशी भविष्यवाणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  पिंपरी-चिंचवडमध्ये केली.

हा भाजपला घरचा आहेर समजला जात आहे. 2014 ची मोदी लाट 2019 ला राहणार नसल्याचे आणि साडेतीनशेचे भाजपने ठेवलेले लक्ष्य गाठण्यात त्यांना अपयश येणार असल्याचेही आठवले यांच्या या वक्तव्यातून अधोरेखित झाले. राजस्थानमध्ये भाजपला 2019 ला फटका बसेल, असे भाकीत आठवले यांनी केले आहे. 

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीस पुन्हा नकार दिला असला,तरी युतीसाठी मी त्यांना विनंती करेल. कारण शिवसेनेला सोबत ठेवणे आवश्‍यक आहे,असे आठवले यांनी सांगितले. भीमा कोरेगाव घटनेनंतर दलित आणि मराठा समाजामध्ये निर्माण झालेली दरी दूर करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक सलोखा परिषदेसाठी आठवले आले होते.

ते म्हणाले, "भाजप, शिवसेना आणि आरपीआय युती असावी अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप एकत्र राहण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी त्यांची नाराजी भाजपने दूर करणे गरजेचे आहे. त्यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद त्यासाठी देणे आवश्यक आहे. लोकसभेला आम्ही राज्यात दोन जागा, विधानसभेला वीस जागा मागणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी राखीव या मतदारसंघावर,तर आम्ही हक्काने दावा करणार आहे. कारण गेल्यावेळी आमच्या उमेदवाराचा तेथे निसटता पराभव झाला होता.`` 

आठवले म्हणाले,""पुणे येथील मुलाखतीत आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, असे पवारसाहेब म्हटले नसल्याचे त्यांनीच मला फोन करून नंतर सांगितले. आर्थिक निकषांवर मराठा समाजाला आरक्षण देण्यास माझी कसलीही हरकत नाही. पीएनबी बॅंकेला साडेअकरा हजार कोटींचा गंडा घालून परदेशात पळून गेलेला नीरव मोदीचा मोठा भ्रष्टाचार ही गंभीर बाब आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या पाठीत खंबीर खुपसला गेला आहे. त्यामुळे त्याला पकडून आणून शिक्षा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

भीमा कोरेगाव प्रकरणी मिलिंद एकबोटे व भिडे गुरुजी दोषी आढळले,तर त्यांच्यावर कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ते म्हणाले, " मराठा व दलित समाजात होणे हे राज्याच्या हिताचे नाही.त्यामुळे या दोन्ही समाजातील गैरसमज दूर करून त्यांना पुन्हा एकत्र आणण्याच्या हेतूने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणून सर्व जाती, धर्माच्या समाजाला पक्षात आणण्यासाठी 16 मार्चला दिल्लीत राष्ट्रीय संमेलन भरविले आहे. त्याव्दारे "आरपीआय'ची स्वतःची आयडेंटिटी निर्माण होणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com