अतुल सावे राज्यमंत्री झाल्याने भाजपचा औरंगाबादच्या पालकमंत्री पदावर डोळा 

भाजपच्या या नव्या मागणीने जिल्ह्यातील शिवसेना-भाजपचे वाद पराकोटीला जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
अतुल सावे राज्यमंत्री झाल्याने भाजपचा औरंगाबादच्या पालकमंत्री पदावर डोळा 

औरंगाबाद : शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरै यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांना राज्यमंत्री पद दिले. उद्योग खणिकर्म, अल्पसंख्याक व वक्‍फ बोर्ड ही खाते त्यांच्याकडे देण्यात आली आहेत.

आता जिल्ह्यातील विकासकामे वेगाने व्हावीत यासाठी अतुल सावे यांनाच पालकमंत्री करावे, अशी मागणी भाजपकडून जोर धरू लागली आहे. शिवसेनेकडे असलेल्या पालकमंत्री पदावर डोळा ठेवत भाजप सेनेला आणखी एक धक्का देऊ पाहत आहे. 

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा पराभव झाल्यापासून भाजपने वरचढ होण्यासाठी अतुल सावे यांना राज्यमंत्रीपद बहाल केल्याची चर्चा आहे. राज्यमंत्री झाल्यानंतर सावे शहरात अजून आलेही नाही. तोच आता जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील भाजपला द्या अशी मागणी भाजपच्या गोटातून सुरू आहे. 

जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे आहे. डॉ. दिपक सावंत यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर ही जबादारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सहा महिन्यात एकनाथ शिंदे यांनी तीन वेळा शहरात येऊन बैठका घेतल्या. 

दरम्यान, राज्य मंत्रीमंडळ विस्तारात आमदार अतुल सावे यांची राज्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. पहिल्यांदाच आमदार झालेल्या सावे यांना निवडणुकीच्या तोंडावर मंत्रीपद देण्यात आले असले तरी त्याचा शहराच्या विकासासाठी किती फायदा होईल हे सांगता येत नाही. परंतु याचा राजकीय फायदा उठवण्याची जोरदार तयारी भाजप पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. 

पालकमंत्रीपदावर दावा... 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप-शिवसेनेच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये दुरावा आला आहे. निवडणुकीत भाजपने युतीधर्म पाळला नाही असा आरोप शिवसेनेचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. भाजप प्रदेशाध्यक्षांपासून नगरसेवक, स्थानिक शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांवर त्यांनी तोफ डागली होती. तर भाजपने खैरे यांच्या आरोपाला फारसे महत्व दिले नव्हते. 

अतुल सावे यांचा राज्य मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांचे मनोबल अधिकच वाढले आहे. यातूनच आता त्यांनी पालकमंत्रीपद देखील सावे यांनाच द्यावे अशी नवी मागणी सुरू केली आहे. 

सध्याचे पालकमंत्री हे मुंबई-ठाण्याचे आहेत. सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळासारखे महत्वाचे खाते त्यांच्याकडे असल्याने त्यांना पालकमंत्री म्हणून जिल्ह्यासाठी फारसा वेळ देता येत नसल्याची मखलासी यासाठी करण्यात आली आहे. 

पूर्ण वेळ पालकमंत्री हवा : शिरीष बोराळकर 

या संदर्भात भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांना विचारले असता ते म्हणाले, शहराचा विकास करायाचा असेल तर रस्ते, पाणी, कचरा, औद्योगिक विकास यासह राज्य आणि केंद्रातील विविध योजनांचा पाठपुरावा घेण्यासाठी अधिक जास्त वेळ देणारी व्यक्ती असायला हवी. जेणेकरून कामाची जबाबदारी निश्‍चित करता येईल.

प्रशासनावर अंकुश ठेवून विकासकामांना गती देता येईल. अतुल सावे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोपवले तर ते स्थानिक म्हणून जास्त वेळ देऊ शकतील, शिवाय विकासाची कामे तातडीने मार्गी लागतील असे आम्हाला वाटते. या मागणीकडे राजकीय हेतू किंवा शिवसेनेला कमी लेखण्याचा प्रकार म्हणून कृपया कुणी बघू नये असे आवाहनही बोराळकर यांनी सरकारनामाशी बोलतांना केले. लवकरच शहरातील महत्वाचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटून सावे यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपवा अशी मागणी करणार आहोत असेही बोराळकर म्हणाले. 

मुंबई येथे शिवसेनेचा आज 53 वर्धापनदिन साजरा होत आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्वच महत्वाचे नेते, पदाधिकारी सध्या मुंबईत आहेत. त्यामुळे भाजपच्या पालकमंत्री पदाच्या मागणीवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समजू शकलेले नाही. एकंदरित भाजपच्या या नव्या मागणीने जिल्ह्यातील शिवसेना-भाजपचे वाद पराकोटीला जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com