भाजपच्या संवाद यात्रेसाठी स्थानिक नेते सज्ज

  भाजपच्या संवाद यात्रेसाठी स्थानिक नेते सज्ज

औरंगाबाद : विरोधकांची संघर्ष यात्रा, मित्रपक्ष शिवसेनेची शिवसंपर्क मोहीम पार पडल्यानंतर येत्या 25 मे पासून भाजपची शेतकरी संवाद यात्रा संपूर्ण राज्यभरात सुरू होणार आहे.

25 ते 28 मे पर्यंत चालणाऱ्या या संवाद यात्रेची जय्यत तयारी स्थानिक नेत्यांकडून सध्या सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पंचायत समिती गणानुसार भाजपचे आमदार, खासदार व नेते गावागावात व शिवारात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 

भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यातील संवाद यात्रेची जबाबदारी व नेत्यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे.

गंगापूर, वैजापूर, खुलताबाद या तीन तालुक्‍यांची जबाबदारी आमदार प्रशांत बंब यांच्यावर, तर औरंगाबाद, कन्नड, पैठण, फुलंब्रीची पूर्वचे आमदार अतुल सावे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

सिल्लोड-सोयगाव तालुक्‍यात भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे व स्थानिक भाजपचे पदाधिकारी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत. शिवार सभा, बैठका आणि नेत्यांच्या सभा असे संवाद यात्रेचे स्वरूप राहणार आहे. 

संवाद आणि तीन वर्षाचा आढावा 
राज्यातील शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव नाही, तूर खरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे, कर्जापायी शेतकऱ्यांच्या आत्महत्या  वाढताहेत. या मुद्यावरुन विरोधक व मित्रपक्ष शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. अशावेळी भाजपने शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे ठरवले आहे.

या संवादातून शेतकऱ्यांची केंद्र व राज्यातील भाजप सरकारबद्दलची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे केंद्राने तीन वर्षात शेतकरी व सर्वसामान्यांसाठी घेतलेले निर्णय सांगण्यात येणार आहेत. कर्जमाफीचा मुद्दा संवाद यात्रेतील प्रमुख केंद्रबिंदू ठरणार आहे.

यावर कर्जमाफी ऐवजी भविष्यात शेतकऱ्यांवर कर्ज घेण्याची वेळच येऊ नये यासाठी उपाय सुचविण्याची विनंती देखील केली जाणार आहे. विरोधकांनी सरकारवर केलेले सगळे आरोप संवाद यात्रेच्या माध्यमातून खोडू काढत शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे. 

कर्जमाफीवर वरिष्ठ नेतेच बोलतील 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दाच संवाद यात्रेत भाजपला सर्वाधिक अडचणीचा ठरणार आहे. यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच जाहीर सभा व मेळाव्यातून भूमिका स्पष्ट करण्याचे ठरले आहे. त्यामुळे स्थानिक आमदार हे फक्त सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले एवढंच सांगतील अशी माहिती देखील भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com