भाजप देशाला आणि शेतकऱ्यांना लागलेली कीड : अब्दुल सत्तार
भाजप सरकार आल्यापासून शेतकऱ्यांची फरपट होत आहे. दुधाला, शेतमालाला भाव नाही, शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहे.
- कल्याण काळे
फुलंब्रीः भाजप ही देशाला व शेतकऱ्यांना लागलेली कीड आहे. या आळीला वेळीच आटोक्यात आणण्याची गरज असल्याची घणाघाती टिका आमदार अब्दुल सत्तार यांनी केली. शुक्रवारी (ता.28) फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथे कॉंग्रेस पक्षाच्या एल्गार यात्रेच्या मेळाव्यात ते बोलत होते.
बोंडआळीमुळे, दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. अशावेळी बळीराजाला धीर देण्याची गरज असतांना भाजप सरकार मात्र शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेत आहे. बी- बियानाचे भाव आकाशाला भिडले, तर खरिपात केलेली लागवड पावसाअभावी पुर्णपणे वाया गेली. तेव्हा सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी 25 हजारांची तातडीने आर्थिक मदत करावी. कुठेलही फॉर्म न भरून घेता ती करावी असा टोला देखील अब्दुल सत्तार यांनी यावेळी लगावला.
भाजप सरकार आल्यापासून शेतकऱ्यांची फरपट होत आहे. दुधाला, शेतमालाला भाव नाही, शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहे. खरिपात लागवड केलेले पीक पावसाअभावी वाळून गेले आहे. शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक मदत सरकार करायला तयार नाही.
बोंडआळी, पीक विमा, कर्जमाफी फसवी असून शेतकऱ्यांची या सरकारने थट्टा चालवली आहे अशी टिका करतांनाच हे सरकार लबाडाचे असल्याची टिका माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांनी केली.